महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अखंड भारताची संकल्पना घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील या यात्रेत जनसागर उसळला असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी होत आहेत.

कन्याकुमारी येथून निघालेली ही भारत जोडो यात्रा ६० दिवसांचा प्रवास करून ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेडमधील देगलूरला आली. तेथे काँग्रेसच्या वतीने यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभारी एच. के .पाटील, पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदींसह काँग्रेसचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार गांधींचे नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून निघाली आहे. विविध राज्यांमधून ती महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रात १४ दिवसात ३८४ किलोमीटरचा यात्रेचा प्रवास होणार असून नांदेड येथे आज पहिली सभा होत आहे. याशिवाय शेगाव येथेही गांधी यांची शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) सभा होणार आहे. नांदेड येथील सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित झाले असून नांदेड विमानतळावर आमदार बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, नाना पटोले आदीसह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. याचबरोबर नांदेड येथील पदयात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांनीही सहभाग घेतला.

हिंगोली जिल्ह्यातून ही पदयात्रा जाणार असल्याने आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्रज्ञा सातव, माजीमंत्री आमदार बंटी पाटील, माजीमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सत्यजित तांबे ,यशोमती ठाकूर आधी काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला. शेगाव येथील सभेची जय्यत तयारी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. यात्रेमध्ये राज्यभरातून राजकीय नेत्यांशिवाय साहित्य, कला, क्रीडा, विविध सामाजिक संघटना, पत्रकारांसह अनेक मान्यवर सहभागी होत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेनंतर खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरत आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि पुरोगामी विचार जोपासणारा असून या संविधान बचाव आणि अखंड भारताच्या एकात्मतेसाठी सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनसामान्यांचा मोठा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर, नगर, उत्तर महाराष्ट्रसह राज्यभरातून लोक सहभागी होत आहेत.

