महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि टोल प्रशासना विरोधात संगमनेर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या उपोषणाला आठवडा उलटत नाही तोच महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आता खासदार अमोल कोल्हे संतप्त झाले असून त्यांनी थेट या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्याचा इशारा दिला आहे.
नासिक-पुणे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे तसेच या मार्गावरील टोल नाके देखील सुरू झाले असून वाहन चालकांकडून टोल असलेली सुरू झाली आहे. मात्र या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे. यातून अपघाताच्या देखील अनेक घटना घडल्या. अनेक जण जायबंदी झाले तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले. महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून येत्या दहा दिवसात जर या रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही तर खड्ड्यामध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावले जातील, असा संतप्त इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे कोणाच्याही तक्रारीची दखल न घेणारे महामार्ग प्राधिकरण आता खासदार कोल्हे यांच्या तक्रारीची दखल घेते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
पुणे नाशिक महामार्गावरील पुणे जिल्हा दरम्यान असलेल्या राजगुरुनगर ते आळेफाटा दरम्यान पर्यायी रस्त्याची कामे आणि सुरक्षा विषयक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार कोल्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांची नुकतीच बैठक घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड, दिलीप शिंदे यांच्यासह सर्व कंत्राटदार उपस्थित होते.
कोल्हे यांनी महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यामुळे धोकादायक बनलेला वाहतुकीचा मुद्दा प्राधिकरण आणि कंत्राटदारांच्या निदर्शनास आणून दिला. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असल्याने त्यांनी नागरिकांच्या तक्रारीची वाट न बघता स्वतःहून जबाबदारीने पुढील दहा दिवसात दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत अन्यथा या खड्ड्यामध्ये कंत्राटदार अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबर टाकून फलक लावण्यात येतील असा इशारा दिला.
कोल्हे यांनी संबंधितांना सुनावत म्हटले आहे की, देखभाल दुरुस्तीसह जर तुम्ही पैसे घेतात तर मग दुरुस्तीची कामे जबाबदारीने करायला हवी. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी नियमितपणे या रस्त्याने ये-जा करत असतात. त्यांना या रस्त्याचे दुरवस्था दिसत नाही का? असा सवाल केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कोणत्याही महामार्गावर खड्डे दाखवा, अशी मोहीम हाती घेतली होती. महामार्गावर खड्डे दाखविल्यास तातडीने बुजविण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

