महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत असतांना करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचा वर्षाच्या आतच बोजवारा उडाला आहे. रस्ते बनवितांना पुरेसे डांबर न वापरल्याने खडी उघडी पडली, क्रॉक्रीटीकरण करतांना निकृष्ठ व पुरेसे सिमेंट वापरले नाही. जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले. येत्या निवडणूकीत रस्त्याचा विषय कळीचा मुद्दा बनविण्यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
रस्ते निरीक्षण पाहणी अभियानात भाजपाचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, माजी उपनगराध्यक्ष व शहर संगठन सरचिटणीस जावेद जहागीरदार, उपाध्यक्ष सुनील खरे, भाऊ जाखडी, भगवान कुक्कर, शाकीर मस्तान आदींचा सहभाग होता.
रविवारी (ता. १३) शहराच्या विविध भागात विशेषत: दिल्लीनाका, कुरणरोड, कोल्हेवाडी रस्त्यालगत मोना प्लॉट, वीर सावरकर मार्ग, स्वामी समर्थ हॉटेल रस्ता, नवीन नगर रस्ता, राजपाल क्लॉथ जवळचा ओंकारनाथ मालपाणी मार्ग, परिवार किराणा ते अकोले बायपास, अकोले बायपासवरील डॉ. सोनांबेकर हॉस्पिटल ते गुंजाळवाडी रस्ता, मिरवणूक मार्गावरील सय्यदबाबा चौक आदी ठिकाणच्या रस्त्यांची पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. वर्षभरापूर्वी केलेल्या या रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना खड्ड्यातुन ये-जा करावी लागते.
पालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपत असतांना शेवटी घाईघाईट मंजुर केलेल्या या विकास कामांची अवस्था दयनीय झाली असून गेली तीस वर्षे नगरपालिकेत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली कॉग्रेसची सत्ता आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेत आपले नातेवाईक, बगलबच्चे, हितसंबधी यांना ठेके देवून विकास कामांचे वाटोळे केले आहे. गुणवत्तेचे कोणतेही मापदंड न लावता कामे केली जातात. नगरपालिका अधिकारी त्याकडे दबावाखाली दुर्लक्ष करतात, परिणामी नव्याने करण्यात आलेले रस्ते खड्डेमय बनले आहे.
गवंडीपुरा मज्जीद-नेहरु चौक-नगरपालिका कार्यालय हा रस्ता गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र या संपुर्ण मार्गांवर पाणी निचरा होण्यासाठी कोठेही एकसुध्दा चेंबर टाकलेला नाही. दीड कोटी रुपये खर्च करुन रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आले मात्र, पाणी निचऱ्यासाठी एकही चेंबर नसल्याने हा रस्ता अनेक ठिकाणी खराब होत आहे. अद्याप या कामासाठी वर्षाचा कालावधीदेखील उलटला नसतांना रस्त्याची ही दुरवस्था समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या कराच्या पैशाचा मोठा अपव्यय झाला आहे. पुढील वर्षी पुन्हा दोन कोटी रुपये खर्च करुन नवा रस्ता बनविला जाईल. पालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मध्यंतरी नगरपरिषद निवडणूकीचे बिगूल वाजल्याने पालिकेची ‘इज्जत’ वाचविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून सिमेंटचे पॅचवर्क करत काही ठिकाणचे खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. निवडणूक जवळ आल्यामुळे भर पावसात नियम डावलून अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
काय आहे या पदाधिकाऱ्यांचे अभिवचन
येत्या निवडणूकीत संगमनेरकरांनी भारतीय जनता पक्षाला पाच वर्ष पालिकेची सत्ता द्यावी. या काळात प्रामाणिक, पारदर्शी, नियोजनपुर्ण व गुणवत्तेवर काटेकोर लक्ष देत एक सुशासन देण्याचे अभिवचन देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

