महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
लाखभर रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांचे लाखाचे कर्ज माफ होत नाही मात्र, उद्योगपतींना कोट्यावधी रुपये माफ केले जातात. देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रेमाने जर शेतकऱ्यांचा आवाज ऐकला, त्यांना मदत केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा द्वेष आणि दहशत पसरविली आहे. या दहशत द्वेष आणि हिंसेविरोधात ही भारत जोडो यात्रा सुरू असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज शेगाव मध्ये आली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी के. सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, भूपेश बघेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंग, जयराम रमेश, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, यशोमती ठाकूर, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते.
गांधी म्हणाले की, 70 दिवसांआधी ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली. समुद्रकिनारी यात्रेला सुरुवात झाली. प्रत्येक दिवशी 25 किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र आणि आता महाराष्ट्रात ही यात्रा आली. विरोधकांनी सवाल केला होता की, यात्रेची गरज काय? काय फायदा आहे? 
देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातं, दोन-तीन उद्योगपती देशाचं कर्ज बुडवत आहेत.
भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे ‘मन की बात’ करण्यासाठी नाही. मुलं लाखो रुपए खर्च करुन शिक्षण घेतात. तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे.

