महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन बांधलेल्या नगरमधील ३ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी उड्डाणपूलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, महापौर रोहीणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखेपाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, स्नेहलता कोल्हे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, मुंबई ते दिल्ली पासून बांधण्यात येणाऱ्या ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’मुळे पुढील काळात अहमदनगर देशाच्या नकाशावर येणार आहे. सुरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्ग चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १४१ किलोमीटर आहे. ८० हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात जेथे शक्य असेल तेथे लॉजिस्टिक पार्क उभारणे शक्य आहे. त्यामूळे नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. एक्सीस कंट्रोलने हा महामार्ग बांधत आहोत. सध्या याची लांबी १६०० किलोमीटर आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल अंतर आणि प्रदूषणही कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यायाने अहमदनगरसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांनी बराच पाठपुरावा केला त्यानंतर युटीलिटी शिफ्टिंग, लष्करी परवानग्यांसाठी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले.
नवीन पुणे-औरंगाबाद महामार्गाचे काम येत्या काळात केले जाईल. सध्याच्या पुणे-अहमदनगर मार्गावर वाघोली शिक्रापूर, रांजणगांव एमआयडीसी ,शिरुर या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते, ती टाळण्यासाठी रामवाडी-वाघोली ते शिरूर दरम्यान 56 किलोमीटरचा महामार्ग उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. साखर कारखानादारांनी आता अधिक साखर उत्पादन न घेता इथेनॉलचा उत्पादनाकडे वळले पाहिजे, असेही ते म्हणाले.
उड्डाणपुलाच्या खांबावरील शिवचरित्राच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचे काम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. उड्डाणपूलाचे काम करतांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उड्डाणपुलाच्या ८५ खांबांवर शिवचरित्र चित्ररूपात साकारण्याची संकल्पना मांडली. यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यातील ३५ खाबांवर शिवचरित्र साकार झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकट्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणखी १७ हजार कोटीची कामे रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून प्रस्तावित केली आहेत. महाराष्ट्र शासन सुध्दा पायाभूत सुविधांसाठी कामे करत आहे.

सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा सोहळा : महसूलमंत्री विखे पाटील
या उड्डाणपुलाच्या उभारणीत दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी, दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याबरोबर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर महानगरपालिकेला या ‘युटिलिटी कॉम्प्लेक्स’ उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून ५० कोटी रुपये दिले होते. त्यामुळे त्यांचे ही या उड्डाणपुलाच्या उभारणीत अमूल्य योगदान आहे. खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी उड्डाणपूल उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा आजचा लोकार्पण सोहळा आहे.

