महाराष्ट्र संवाद न्यूज
“आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
एका जुन्या व्हिडीओचा आधार घेत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला अंधारे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय त्यांनी शिंदे गटात नाराज आमदारांची संख्या वाढत असल्याने लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांनी थेट नावे घेत सांगितले की, “नाशिकमधील सुहास कांदे नाराज आहेत. औरंगाबादेतील संजय शिरसाट हे नाराज आहेत. शिंदे गटातील नाराजांची संख्या फार मोठी आहे. ज्या-ज्या लोकांना घेऊन गेले होते, त्या सर्वांनाच मंत्रीपदाची गाजरं दाखवण्यात आली होती. मात्र या सर्वच लोकांना संतुष्ट करणे एकनाथ शिंदे तसेच भाजपाला अशक्य आहे. भाजपाची स्थिती घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं, अशी झाली आहे. 
कृषीमंत्री अब्दुल सत्तार बडबड करत मुख्यमंत्र्यांच्या दालनातून बाहेर आले होते. त्यांचा हा व्हिडीओ सर्वांनीच पाहिला असेल. प्रताप सरनाईक हेदेखील मुख्यमंत्र्यांवर चिडले होते. प्रताप सरकारनाईक, गीता जैन आणि नरेंद्र मेहता या तीन नेत्यांनी मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या एका बैठकीत एकमेकांना बसायला खुर्च्या दिल्या नाही. त्यामुळे २०२३ साली मध्यावधी निवडणुका लागतील हे नक्की,” असे अंधारे म्हणाल्या.

