महाराष्ट्र संवाद न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या उद्योगधंद्यावरुन पंतप्रधान मोदींना सुनावले.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधीत केले, त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री अब्दूल सत्तार, महापुरुषांची बदनामी करणारे तसेच उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सल्ला देत टोलेबाजी केली.
आपल्या भाषणातून राज्यपाल कोश्यारी यांचा एकेरी भाषेत समाचार घेतांना राज ठाकरे म्हणाले, ‘त्या दिवशी आमचं ते धोतर बोललं नाही का… कोश्यारी वय काय, बोलतोस काय, काय चाललय. राज्यपाल पदावर बसला आहेस म्हणून मान राखतो, नाहीतर राज्यात शिव्यांची कमतरता नाही. ते महिनाभरापूर्वी बोलून गेले, इथले जर गुजराती आणि मारवाडी परत गेले, तर इथे काय होईल. कोश्यारीजी आधी त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा तुम्ही तुमच राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती आहात ना, तुम्ही व्यापारी आहात ना… मग तुमच्या राज्यात का नाही व्यापार केलात? का नाही उद्योग थाटलेत? याच कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. म्हणून ते आलेत महाराष्ट्र नेहमी मोठा आहे.
ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांवरदेखील जोरदार टीका केली, हल्ली कोणी काय येतंय काही बरळतंय. राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात… अरे कोणती भाषा. मी असा महाराष्ट्र बघितला नाही. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. काय भाषा असते काय बोलत असतात. त्यांना वाटतं विनोद करतो. तू कोण आहेस, आपली लायकी काय आपण काय बोलतो. मला भीती वाटते, आताचे तरुण हे पाहत असतील आणि ते म्हणत असतील असे असते का राजकारण? मग ठीक आहे, जातीपातीचे विष कालवण्यासाठी हे सुरू आहे का? असा उद्वीग्न सवाल त्यांनी केला.
कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी गांधी यांच्यावर टीका करतांना म्हटले की, ‘म्हैसूर सॅन्डल सोप, महाराष्ट्रात आला होता. राहूल गांधीचा मेंदू गुळगुळीत झाला आहे’ राहुल गांधी बोलतो की आर.डी. बर्मन बोलतो ते कळतं का? तुझी लायकी आहे का सावरकरांवर बोलायची. कुठ ठेवल होत. काय हाल अपेष्ठा सहन केल्या ते पाहिलंय का? सावरकरांनी माफी मागितल्याच सांगीतले. दयेचा अर्ज, एक स्ट्रॅटेजी असते. एक माणूस दयेचा अर्ज करतो. ५० वर्षाची शिक्षा झालेला अर्ज देवून बाहेर येतो आणि हंगामा करतो, ती स्ट्रॅटेजी असते. स्ट्रॅटेजी ज्याला समजत नाही, तो गुळगुळीत मेंदूचा असतो. यासाठी त्यांनी कृष्णनीती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगासोबत केलेल्या कराराचा दाखला दिला. कॉग्रेस आणि भाजपला माझ सांगण आहे की, पंडीत नेहरु, इंदिरा गांधी कशा वाईट होत्या हे सांगण बंद करा, ज्यांनी देशासाठी लढा दिला त्यांची बदनामी करुन हाताला काय लागणार आहे. आपण ज्या प्रकारचा चिखल करुन ठेवत आहे त्यामुळ भविष्यातील पिढ्यांसाठी आदरांची स्थान असतील का?
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीकास्त्र सोडले, कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले. बाळासाहेब जी भूमिका बोलत होते भोंगे उतरले पाहिजे ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले. पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही. जिथे जिथे हे सुरु असेल तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा असे ते म्हणाले.

