महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा निश्चित करण्यात आली नसून पुतळ्यासाठी करण्यात आलेली तरतूद देखील ५० लाखावरून २५ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे, अशाप्रकारे बोगस तरतुदी करण्यात आल्याचे स्पष्ट करत ‘खोटे बोला पण रेटून बोला, हे काँग्रेसचे विकास मॉडेल’ असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे.
राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये भाजपची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे विधान जहागीरदार यांनी केले होते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी जागा निश्चित केली आहे. तसेच पुतळ्यासाठी पन्नास लाख रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी म्हटले होते. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमधील वाद यामुळे समोर आला होता.
जहागीरदार यांनी दिवटे यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ घेत संगमनेर नगरपालिकेकडे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलेली जागा आणि त्यासाठीची तरतूद याची माहिती मागविली होती. यावर नगरपालिकेचे उत्तर जहागीरदार यांना प्राप्त झाले असून यात अशा प्रकारची कोणतीही जागा निश्चित करण्यात आली नसल्याचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात दाखविण्यात आली होती, मात्र त्यानंतरच्या अर्थसंकल्पात हीच तरतूद कोणत्याही प्रकारचा खर्च न होता २५ लाखावर नेण्यात आली. त्यामुळे अशा प्रकारच्या तरतुदी बोगस असल्याचे जहागीरदार यांनी म्हटले आहे.
दिवटे यांचे विधान म्हणजे यशोधनची स्क्रिप्ट असल्याचा आरोप करत जहागीरदार यांनी दिवटे यांचा खोटेपणा माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीद्वारे समोर आणला. भारतीय जनता पार्टीला संगमनेरकरांनी कौल दिल्यास तीस वर्षाचा विकास पाच वर्षात करून दाखविणार असल्याचे पुन्हा म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे संगमनेर तालुका आणि शहरात प्राबल्य वाढत असल्याने येथील सत्ताधारी नेते अस्वस्थ झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदी म्हणजे प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे पैसे उपलब्ध नसतात गेल्या ३० वर्षापासून शहरातील नागरिकांना खोटे बोलत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांनी राज्य केले आहे. सत्ताधाऱ्यांचे विकासाचे मॉडेल म्हणजे भूमाफिया, टेंडर माफिया, निकृष्ट कामे, जास्त दराने टेंडर, घरपट्टीत प्रचंड वाढ, आरोग्याची कोणतीही सुविधा नसताना दवाखाना फक्त नावाला, भाजी मार्केट करता आले नाही, फिल्टर प्लांट असताना शुद्ध पाणी देता आले नाही असा तीन दशकांचा सत्ताधाऱ्यांचा प्रवास असून या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नसल्याचे जहागीरदार यांनी स्पष्ट केले आहे.
संगमनेरकरांनी भारतीय जनता पक्षाला पालिका निवडणुकीत कौल दिल्यास भाजप सत्ताधाऱ्यांनी तीस वर्षात केला नाही एवढा विकास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात करून दाखवणार असल्याचे म्हटले आहे.

