महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय. हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर “छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. करारा जवाब मिलेगा असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं अजब विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची लाड यांनी केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे रविवारी समृद्धी महामार्गाची पाहणी दरम्यान त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तर या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे भाजपावर टीका केली आहे.
“भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार” शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?” असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला केला आहे. याचबरोबर “करारा जबाब मिलेगा!” असं म्हणत कोण प्रसाद लाड? तो काय दत्तू वामन पोतदार आहेत का? रोज भाजपाचा एक नेता उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो. ते इतिहासतज्ज्ञ आहेत का? भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करेल. शिवाजी महाराजांची तलवारच यांच्या पक्षाचं मुंडकं छाटेल. यांच्या स्वप्नात अफझलखान आणि औरंगजेब येतो आणि यांच्या कानात काहीतरी बोलतो म्हणून हे नेते असं बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायची यांची लायकी आहे का?असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केली आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी नवा नीती आयोग स्थापन करून त्यावर स्वतःच्या मर्जीतील बिल्डर बसवले. त्याप्रमाणे भाजपाने इतिहास मंडळाची स्थापना करून आपली माणसं बसवली आहेत का? असा प्रश्नही राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला.हे ठरवून चाललंय का? औरंगजेब अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत.शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?
करारा जबाब मिलेगा! pic.twitter.com/Y4jjVLR9SZ— Sanjay Raut (@rautsanjay61) December 4, 2022
तर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर जास्त भाष्य न करता छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला हे अख्ख्या जगाला माहीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय त्यांनी समृद्धी संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आज हिंद हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा आहे. ११ तारखेला देशाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण होईल. नागपूर ते शिर्डी ५२० किलोमीटर समृद्धी महामार्ग आहे, तो लोकांसाठी खुला होईल. लोकांची मोठी सोय होणार आहे. 
त्यामुळे त्याच्या नियोजनाची तयारी पाहण्यासाठी मी आणि उपमुख्यमंत्री आलेलो आहोत. विदर्भ, मराठवाड्याला जोडणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या कामाच्या पूर्णत्वाकडे त्यांनी जातीने लक्ष दिलं होतं.

