महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे सांगणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानाबद्दल ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
आमदार लाड यांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून यामुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष आधीच अडचणीत सापडला असताना लाड यांचे वक्तव्य पक्षासमोर अडचणी निर्माण करणारे ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करत त्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय, त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.
ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केला आहे. स्वराज्य कोकण भूमी त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं. तसेच माझी चूक देखील मी सुधारली होती. तुम्ही व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल. 
त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला, असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय जाधवरावांनीदेखील म्हटलं, तेसुद्धा मीडियात आलेलं आहे. 
परंतु तरीदेखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करीत आहे. त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असंही प्रसाद लाड म्हणालेत.
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. pic.twitter.com/Nyps1jqs7U
— Prasad Lad (@PrasadLadInd) December 4, 2022

