रविवार विशेष
शनिवारी सकाळीच ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचा फोन आला आणि त्यांनी सुलोचना चव्हाण ऊर्फ माईंच्या प्रकृतीबद्दल काही माहिती घ्यायला सांगितलं. जेमतेम अर्धा तास गेला आणि माई गेल्याची बातमी आली. क्षणार्धात एक सांगितिक पट डोळ्यासमोर उभा राहिला.
काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर ढोलकीच्या तालावर नावाचा लावण्यांचे सादरीकरण असलेला एक रियालिटी शो गाजत होता. माझे मित्र पानिपतकार विश्वास पाटील त्याचे परीक्षक होते. त्यांच्या निमंत्रणावरून या शोचे शूटिंग बघायला मुंबईला गेलो. त्या दिवशी या शो साठी पाहुण्या परीक्षक म्हणून सुलोचना चव्हाण हजर होत्या. माईंनी परीक्षक म्हणुन लावणी सादर करणाऱ्या कलावतींना त्या दिवशी केलेले मार्गदर्शन ऐकून त्यांचा लावणीचा अभ्यास थक्क करून गेला. त्या दिवशी शूटिंगच्या मध्यांतरात माईंशी गप्पा झाल्या. आज त्या सगळ्या आठवणी दाटून आल्या.
माई गेल्याच्या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच विलास वाघमारे गेल्याची बातमी आली. तमाशा क्षेत्राशी ज्यांचा नजिकचा संबंध आहे अशा बहुतेकांना विलास वाघमारे हे नाव परिचित आहे. तमाशा सृष्टीत आज उत्तम म्हणावे असे जे काही मोजके चार पाच सुरते आहेत त्यात विलासचा नंबर खूप वरचा. गेल्या दोन दशकांपासून विलास वाघमारे हा माझा प्रचंड आवडता सुरत्या. तमाशाचा गण, गवळण, शिलकर ते भैरवी पर्यंत विलास आपल्या आवाजाने वातावरणात एक वेगळीच सांगितिक जादू निर्माण करायचा. उजव्या हातात तुणतुणे घेऊन डावा हात कानावर ठेऊन विलासने झील धरली की गाण्याचं सोनं व्हायचं. मलाही आजही कुणी तू रघुवीर खेडकरांच्या तमाशात नेमकं काय काय बघण्याचा प्राधान्य देतो तेव्हा माझं उत्तरं असतं, खेडकर परिवार तर माझाच परिवार आहे त्यामुळे त्यांचा नामोल्लेख न करता सांगायचं झालं तर मी शिवाजीराव थोरात यांची हलगी, शैलेश भंडारेची ढोलकी आणि विलासचा भैरवी गातानाचा सूर…
संध्याकाळी विलास गेल्याची बातमी कळताच मला मंगलताई बनसोडे यांचा फोन आला. त्यांनी मी टाकलेली बातमी वाचली आणि लगेच फोन केला. त्यांच्या शब्दाशब्दातून विलासबद्दलचा स्नेह जाणवत होता. हिच अवस्था रघुवीर खेडकर यांची झाली होती. विलासच्या अनेक आठवणी आहेत. अनेकजण सूरत्या म्हणजे काय असा प्रश्न करतात तर अनेकांना सिनेमात दाखवलेला तुणतुणे वाजवणारा आठवतो.पण तमाशात खऱ्या गायक किंवा गायिकेला तुणतुणे वाजवणाऱ्या सूरत्याचे महत्व माहीत असते. भीमसेनजी किंवा अभिषेकी बुवांच्या मैफिलीत मागे वाजणाऱ्या तंबोऱ्याचे जेवढे महत्त्व असते तेवढेच महत्व तमाशात तुणतुणे वाजवणाऱ्या सूरत्याचे असते. आपल्याच मराठीतल्या अनेक मूर्ख दिग्दर्शकांनी लावणी सूरू असताना तुणतुणेवाला इकडून तिकडे उड्या मारताना दाखवला आहे हे आपले दुर्भाग्य.
दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा भरल्या होत्या तेव्हा रघुवीर खेडकर, कांताबाई आणि इतर कलाकार घेउन मी दिल्लीला गेलो होतो. रघुवीरसह बहुतेक कलाकार आयुष्यात पहिल्यांदा रेल्वेत बसले होते. आमचा रेल्वे प्रवास सुरू असताना मथुरा स्टेशन आले. मी आजुबाजूला बसलेल्या कलाकारांना मथुरा आल्याचे सांगताच सगळ्यांनी पटापट हात जोडले. कुणी उजव्या बाजूला बघुन तर कुणी डाव्या बाजूला बघुन हात जोडले. त्यावेळी विलासने एक वाक्य उच्चारले, ” तमाशात काम करताना आयुष्यभर ज्या देवाची आम्ही मस्करी करतो, त्यांच्या गवळणी गातो, आमच्या कलेतून मथुरेचा बाजार उभा करतो त्या कृष्णाच्या मथुरेला रेल्वेतून का होईना पाहायला मिळल असा स्वप्नातही वाटलं नव्हतं. 
आमच्या दिल्ली दौऱ्याचं विलासला मोठं अप्रूप. दिल्लीत आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो तिथे गेल्यावर तरं विलास जाम खूश झाला. “साहेब हाटीलच्या खोलीत टिव्ही बिव्ही हाये… लई भारी सोय केली तुम्ही…” हे सांगताना विलास एखादया लहान मुलासारखा हुरळून गेला होता. दिल्लीत हॉटेलबाहेर आणि नंतर चंदीगडला स्टोन गार्डनमध्ये फोटो काढताना विलासने आयुष्यात पहिल्यांदा गॉगल लाऊन फोटो काढले. आमच्या या दिल्ली दौऱ्यात काय काय मिळालं याचा विचार करताना मला सर्वाधिक महत्वाची वाटलेली गोष्ट म्हणजे आमच्या 99 टक्के कलाकारांनी आयुष्यात पहिल्यांदा दिल्ली पहिली, आयुष्यात पहिल्यांदा एसी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि देश विदेशातल्या पाहुण्यांकडून दाद मिळवली. 
विलासची काळजात घर केलेली आणखी एक आठवण म्हणजे एकदा होळीच्या दिवशी मालेगावजवळ एका खेड्यात रघुवीर खेडकर यांचा तमाशा होता. दुसऱ्याच दिवशी मुंबई विद्यापीठात तमाशा सादर करायचा म्हणुन मी आदल्या दिवशी त्यांना सामील झालो. त्या रात्री सुमारे दोन अडीच वाजता तमाशा संपला. पौर्णिमेची रात्र, सगळीकडे लख्ख चंद्रप्रकाश पडलेला आणि स्टेजच्या मागे उभे राहून आमचे कलाकार माऊली… माऊली… आमची ज्ञानेश्वर माऊली ही भैरवी गात होते. मुळात भैरवी हा माझा प्रचंड आवडीचा प्रकार पण त्या दिवशी मी पहिल्यांदा मध्यरात्रीच्या नीरव शांततेत भैरवीचे आर्त सूर ऐकत होतो…
आमचा विलास डोळे शांतपणे मिटून भैरवीचे सूर आळवित होता आणि बाकीचे कलाकार त्याच्या आवाजात आपला आवाज मिसळून माऊलींची आळवणी करीत होते. त्या मध्यरात्री मी जगातला सर्वात सुंदर सूर अनुभवला… विलासच्या रापलेल्या सावळ्या चेहऱ्यावर पडलेला चंद्रप्रकाश आणि डोळे मिटून आजूबाजूची नीरव शांतता भेदून जाणारे त्याचे आर्त सूर… त्या रात्री विलासचा आवाज थेट काळजात शिरत होता… भीमसेन जोशींनी एका अभंगात ‘ लागली समाधी ज्ञानेशाची…’ असं जे म्हटलं त्याची साक्षात अनुभुती मी घेत होतो. विलासची अक्षरशः समाधी लागली होती… आज विलास आठवताना मला सर्वप्रथम त्याचे ते भैरवीचे सूरच आठवताहेत… विलासच्या आयुष्याचीही भैरवी झाली आहे… लावणी क्षेत्रातील सच्चा सूर असलेल्या सुलोचना चव्हाण उर्फ माईंच्या बरोबर या जगातून विलासही गेला. लावणीसोबत लावणीची झीलही गेली… दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली …
डॉ. संतोष खेडलेकर

