महाराष्ट्र संवाद न्यूज
सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या अपघातामध्ये पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे सर्व विद्यार्थी संगमनेरमध्ये एका लग्न समारंभासाठी आल्याचे समोर आले होते. हे विद्यार्थी कोणत्या लग्नासमारंभासाठी आले होते, याची माहिती पोलीस घेत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातातील सर्व विद्यार्थी आई-वडिलांना अंधारात ठेवून सहलीसाठी गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नासिक पुणे महामार्गावर सिन्नर जवळील मोहदरी घाटामध्ये शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात हर्ष दीपक बोडके, मयुरी अनिल पाटील, शुभम ताडगे, प्रतीक्षा दगू घुले व सायली अशोक पाटील या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर साक्षी नितीन घायाळ, साहिल गुणवंत वारके व गायत्री अनिल फडताळे हे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय दुसऱ्या कारमधील सुनील ज्ञानेश्वर दळवी हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर देखील नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.
सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी अपघातासंदर्भात तपास सुरू केला असता या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्या आई-वडिलांना फारशी माहिती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन असलेले हे आठही महाविद्यालयीन विद्यार्थी एकाच स्विफ्ट कारमधून संगमनेरमध्ये नेमके कोणत्या लग्नाला गेले होते याचा शोध लागत नसल्याने आणि पालकांनी याबाबत काही माहिती नसल्याने पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले होते.
त्यामुळे पोलिसांनी तपास सुरूच ठेवल्याने हे सर्व विद्यार्थी संगमनेरमध्ये कोणत्याही लग्न समारंभासाठी आलेले नव्हते. तर ते सहलीसाठी गेल्याचे समोर आल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले.
खाजगी क्लासमध्ये झाली मैत्री
अपघातातील मृत आणि जखमी असलेल्या आठही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची खासगी क्लासमध्ये शिकत असताना ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे सुरू होते. केटीएचएम, सामनगाव पॉलीटेक्निक आणि भोसला महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

