प्रवीण पूरो | रविवार विशेष
सत्ता माणसाला जशी लाचार बनवते तशी ती घमेंड चढवते असं म्हणतात. जो या दोन्हीपासून स्वत:ला सावरतो तोच सत्तेवर स्वार होतो. ही सत्ता डोक्यात गेली तर त्याचं हसं होतं. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्थिती अशीच काहीशी झाली आहे. गेल्या आठवड्यात पाटलांनी टीव्हीचा पडदा आपल्याकडे खेचून घेतला होता. तो सकारात्मक मुळीच नव्हता. पाटलांमध्ये आलेल्या गुर्मीचा तो आखो देखा हाल होता. स्वत:ला संघाचा पायिक समजला जाणारा माणूस इतका खाली येऊ शकतो, याची लाज संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटेल इतका माजोरडेपणा पाटलांच्या नसानसात भिनलेला जगाने पाहिला. संघाचं लेबल लावलेली माणसं इतकी वाह्यात नसतात, असं तिथले कार्यकर्ते बोलून दाखवतात. मग वयाची 63 पूर्ण केलेली व्यक्ती अशी कशी काय वागू शकते. त्यात ती राज्याच्या शिक्षण विभागाची मंत्री आहे ती इतकी वादग्रस्त बनू शकते, हे प्रथमच पाहायला मिळालं.
राज्य ज्यांना आपलं दैवत मानतं अशा मान्यवरांविषयी नसती वक्तव्यं करण्याची भाजपमध्ये सध्या स्पर्धा लागली आहे. या विभूतींच्या पायाजवळ उभी राहण्याची ज्यांची पत नाही असे उडपटांग काहीही बोलू लागले आहेत. कोणत्याही स्थितीत देवेंद्र फडणवीस आपल्याला पावले पाहिजेत, यासाठी हे नेते येनकेन प्रकारेन स्वत:कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे आज होतं असं नाही. या विचाराने छत्रपती शिवरायांनाच काय सुधारकांनाही सोडलं नाही. एका प्रशांत परिचारक या आमदाराने पंढरपुरात तोडलेले तारे भाजपचे नेते विसरलेले दिसतात. छत्रपती शिवरायांविषयी अत्यंत गलिच्छ शेरेबाजी करणार्या या परिचारकाची राज्यभर छी-थू झाली होती, हे लक्षात असूनही भाजपचे नेते स्वत:ला सावरू शकले नाहीत. छत्रपती शिवराय असो की राजश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर असोत की महात्मा ज्योतिबा फुले असोत या विद्वानांप्रति महाराष्ट्राची मान तुकणं स्वाभाविक आहे. देशावर आणि महाराष्ट्रावर अनंत उपकार करणार्यांविषयी कोणीही काहीही बोलेल हे ऐकून घेतलं जाऊ शकत नाही, याची जाणीव भाजपच्या तमाम नेत्यांना अजूनही झालेली दिसत नाही. तेव्हा आपल्या कर्माची फळं चाखण्याची तयारी या नेत्यांनी ठेवायलाच हवी. राज्य सरकारकडे अनुदान मागणार्या शिक्षण संस्थांना अक्कल शिकवू पहाणार्या मंत्री पाटलांनी काहीही बोलावं आणि जनतेने ते निमूट ऐकावं हे शक्य नाही. या मान्यवरांनी भीक मागून संस्था चालवल्या असं बेमालूम बोलणार्या पाटलांनी शाईफेक झाल्यावर आकांडतांडव सुरू केला. आपणच जणू सत्यवानाचे अवतार आहोत असा अविर्भाव पाटलांचा होता. शाई फेकण्याच्या कृतीचं कोणी समर्थन करणार नाही. पण इतकं टोक एखादा कार्यकर्ता का गाठू शकतो, याची पडताळणी भाजप करणार कधी? जिभेला हाड नसावं इतक्या खाली येणार्या नेत्यांना शाईचीच भाषा कळत असेल तर कोण काय करणार? 
हे कृत्य आपल्या कॅमेर्यात टिपणार्या पत्रकारावरही पाटलांनी नको ती शेरेबाजी केली. केवळ शेरेबाजी करून पाटील थांबले नाहीत. पाटलांवरील शाईफेकीचं प्रकरण टीव्हीवर झळकू लागल्यावर पाटील बिथरले. त्यांचा तिळपापड झाला. वाटेल ते बेफामपणे बोलू लागले. शाई फेकणार्यांनी पत्रकाराला घेऊन कट केल्याचा आरोप पाटील करू लागले. या पत्रकाराला अटक न झाल्यास पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला बसण्याची धमकी पाटलांनी दिली. पाटील इरेला पेटले. त्यांच्या या धमकीपुढे पुण्याचे पोलीस गर्भगळीत झाले. फडणवीस आपल्याला कामाला लावतील ही भीती त्यांना सतावू लागली. मागे पुढे न पाहाता पोलिसांनी पत्रकाराविरोधात 307 लावून त्यांच्या अटकेची तयारी सुरू केली. या कलमाचा अर्थ पोलिसांऐवजी चंद्रकांत पाटीलच सांगू लागले. आपल्या हत्येचा कट होता असा आरोप ते करू लागले. शाईफेक म्हणजे हत्येचा प्रयत्न, हा नवा गुन्हे प्रकार बाहेर आला. पाटलांची ही बौध्दिक दिवाळखोरीच होती. पोलिसांना धमकवायचं आणि हवं ते कलम टाकायचं ही वृत्ती जागी झाली. एव्हाना फडणवीसांना हस्तक्षेप करून प्रकरण थांबवता आलं असतं. पण ते चलाख. त्यांनी पध्दतशीरपणे तीन दिवस घालवले. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी आपली वाघनखं बाहेर काढत पुन्हा राजकारण केलं.
पाटलांच्या शाईपुराणानिमित्त हाती घेण्यात आलेल्या कारवाया पाहाता राज्यात आमच्याशिवाय कोणाचं चालणार नाही, असंच दाखवण्याचाच प्रयत्न होता. संबंधित पोलीस ठाण्यातील 11 जणांना निलंबित करण्याबरोबर पाच जणांविरोधी हत्येच्या प्रयत्न या कलमाखाली गुन्हे नोंदवण्यात आले. हे करताना पत्रकारांनी आमच्याविरोधात काय दाखवावं, किती लिहावं याचे धडे देण्याचा प्रयत्न झालाच. गंभीर म्हणजे विरोधकांना धडा शिकवण्याचा मार्ग गृहमंत्र्यांनी यानिमित्त आखून दिला. हे म्हणजे हुकूमशाहीचं उघड समर्थन होतं. पोलिसांना निलंबित केलं की ते विरोधकांना कामाला लावतील आणि पत्रकाराला गोवलं की आपल्या विरोधात लिहिण्याची हिंमत करणार नाहीत, अशी मानसिकता यामागे दिसत होती. याविरोधात राज्यभर आगडोंब उसळणं स्वाभाविक होतं. जी 20 च्या निमित्त भाजप स्वत:चा ढोल बडवत असताना पत्रकारांना असं अंगावर घेणं अवघड होतं. हे गृहमंत्र्यांना ठावूक होतं. पण दुसरीकडे धडाही शिकवायचा होता. तो अंगलट आला आणि लावण्यात आलेली कलमं मागे घेण्याची नामुष्की ओढावली.
इतकी बेईज्जती होऊनही भाजपच्या मंडळींना अक्कल का येत नाही? ज्यांना अक्कल कशाने खातात हेही ठावूक नाही, असली माणसं छत्रपती शिवरायांवर बोलतात याचं भाजप नेत्यांना काहीच कसं वाटत नाही? एकीकडे भगतसिंह कोश्यारींसारख्या राज्यपालांनी कमरेचंही सोडल्यागत बोलावं आणि त्यांना सावरण्यासाठी फडणवीसांच्या पत्नीने सारवासारव करावी इतके छत्रपती भाजप नेत्यांना लहान वाटू लागावे, हे अजबच म्हटलं पाहिजे. एव्हाना या विचारांनी वा त्या विचाराच्या लोकांनी छत्रपतींना आपलंसं कधीच मानलं नाही. यामुळेच शिवरायांच्या गुरूंपासून वडिलांपर्यंतच्या अस्तित्वाची चर्चा ते सतत करत असतात. पण छत्रपती हे छत्रपतीच आहेत. त्यांच्याशी तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. तरीही कोण लोढा उठतो आणि छत्रपतींच्या पेटार्यांची तुलना एकनाथ शिंदेंच्या कृतीशी करतो. याहून आचरटपणा काय असू शकतो? ज्या पाटलांमुळे भाजपची लाज रस्त्यावर आली त्या पाटलांनी यानंतर केलेल्या वाचाळपणाची तर कमालच झाली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रोहित पवार यांना उद्देशून एकेरी उल्लेख करताना आपण गिरणी कामगार पुत्र असल्याची आठवण पाटलांना झाली. गिरणी कामगाराचा मुलगा पुढे जात असल्याची पोटदुखी पवारांना झाल्याचं तुणतुणं पाटलांनी वाजवलं. पण हेच गिरणी कामगार देशोधडीला लागले तेव्हा पाटील कुठल्या बिळात होते? कोणाविषयी आपण काय बोलतो, याचंही भान पाटलांना राहिलं नाही. सुप्रिया सुळे यांना म्हसणात जायला सांगणार्या चंद्रकांत पाटलांविषयी आता कोणालाच अपुलकी राहिलेली नाही. छत्रपतींच्या नावाने राज्य कारभार करणारे छत्रपतींचा अवमान सहन करू शकत असतील तर पाटील काय वेगळं करतात? राज्यभर धिंडवडं काढलं जात असताना या नेत्यांचे कान पकडले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र तसं होण्याऐवजी मान्यवरांवर शेरेबाजी करणार्यांची स्पर्धात भाजपमध्ये सुरू झालेली दिसते आहे. अति झाल्यावर माफीनामा देण्याचा प्रयत्न झाला. पण तोवर पुलावरून पाणी गेलं होतं. व्हायचं ते झालं आणि भाजप नेते उताणे पडले.
बोलायची संधी मिळाली म्हणून काहीही बोललं तरी लोकं ऐकतात असं नव्हे. याचे परिणाम मग सर्वदूर होतात. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. होत्याचं नव्हतं होतं आणि माघार घेण्याची आपत्ती येते. चंद्रकांत पाटलांसाठी हा आणखी एक धडा आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. लोकं माफीनामा घेऊन सतत पावन होत नसतात. त्यालाही काही मर्यादा आहेत. या मर्यादांचं पालन केलं तर ठिक अन्यथा बॅनरवरील छबीचं काही खरं नाही…

