महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : खरेदीवेळी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या संरक्षणासाठी सरकारने काही कायदे बनविले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेरचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनी शनिवारी संगमनेरच्या तहसील कार्यालयामध्ये ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना विविध मान्यवरांनी त्यांच्या हक्काबद्दल माहिती दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतीचे संगमनेर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, तालुका सचिव कारभारी देव्हारे, कायदेशीर सल्लागार गोडसे, विनायक वाडेकर, दिनेश थोरात यांच्यासह वजन मापे निरीक्षक फटांगरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान कारभारी देव्हारे, विनायक वाडेकर, फटांगरे यांनी ग्राहकांच्या हक्काविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गॅस एजन्सी आणि वीज वितरण कंपनी विरोधात ग्राहकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. उपस्थित आणि या तक्रारीचे निराकरण करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा विभागाचे सुनिल दुर्गुळे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरवठा विभागाचे गणेश भालेराव, मारुती गंभिरे, सोपान वाकचौरे, स्वप्नील पडवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

