महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : ग्रामसभा सुरू असताना सार्वजनिक कामाबाबत प्रश्न विचारला म्हणून प्रश्न विचारणाऱ्यास शिवीगाळ आणि लाथाबुक्क्याने मारहाण करत विरोधात बोललास तर कायमचा संपवून टाकेल, अशी धमकी गाव कारभाऱ्यांनी दिली. एवढ्यावरच समाधान न मानता या सामाजिक कार्यकर्त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून तोंडात औषध टाकत दोन गाड्यांमधून आलेल्या गावगुंडांनी प्राणघातक हल्ला करत जबर मारहाण करण्याचा प्रकार तालुक्यातील पठार भागात घडला.
संगमनेर तालुक्यातील साकुर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे यांनी साकूर ग्रामसचिवालयात सुरू येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत नाही. म्हणून पाणीपुरवठा का बंद आहे असे विचारणा ग्रामसेवकाला केली असता संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर हनुमंत खेमनर त्याला म्हणाले, तुझा येथे बोलण्याचा काहीएक संबंध नाही तू खाली बस. त्यावर इघे याने त्यांना समजावून सांगितले की, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही, तो जनतेचा हक्क आहे.
त्याचा राग येऊन शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, अनमोल खेमनर, हर्षद खेमनर, रफीक चौगुले, आबा वाकचौरे, गणपत पवार आणि ग्रामसेवक नागेश पाबळे यांनी शिवीगाळ, दमदाटी करून इघे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू जर आमच्याविरुध्द आवाज उठवला तर तुला कायमचा संपवून टाकीन. तू जर आमच्याविरुध्द पोलिसांत तक्रार दिली तर तुझ्यावर आम्ही ग्रामसेवकाकरवी गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. याबाबत सुनील इघे यांनी घारगाव पोलिसांत फिर्याद दिली घारगाव पोलिसांनी या संदर्भात गुन्हा देखील दाखल केला होता.
त्यानंतर रात्री इघे व त्यांचे दोन मित्र साकुरकडे परतत असताना हिवरगाव पठार घाटात आले असता अचानक दोन गाड्यांमधील २०-२५ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. इघे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका मित्राचा मोबाइल या टोळक्याने हिसकावून घेतला व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या गडबडीत त्यांच्याबरोबर असलेला दुसरा मित्र सटकला व तो घटनास्थळावरून गायब झाला.
दूर गेल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच मारहाण करणारे पसार झाले. पोलिसांनी जखमी इघे यांना संगमनेर येथे उपचारासाठी आणले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इघे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. घारगाव पोलिसांनी सुजित अशोक खेमनर, अनमोल शंकर खेमनर, आबा वाकचौरे, बाजीराव सतु खेमनर, संतोष धोंडीभाऊ खेमनर, उमेश अशोक गाडेकर, गणपत बाळासाहेब पवार, किशोर बापु गाडेकर, रफिक सिकंदर चौगुले, भगवान सुभाष शेंडगे, लखन सुभाष शेंडगे, बालम सुलेमान पटेल, दत्तात्रय सुभाष रेणुकादास, फिरोज सरदार पटेल, सुधिर सयाजी फटांगरे कल्पेश गडगे (पुर्ण नांव माहित नाही), सर्व रा. साकुर या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून इतर १० ते १५ जणांना आरोपी केले. यातील बाजीराव खेमनर, संतोष खेमनर आणि सुधीर फटांगरे या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपी फरार झाले आहेत. या घटनेने संगमनेर तालुक्यातील पठार भागात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे.



