महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
शासनाने गौण खनिजा संदर्भात केलेल्या जाचक नियम आणि कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय कोलमडून पडला असून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या पुरवठादार मजूर आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरू झाली आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ७ डिसेंबर) या व्यवसायाशी निगडित पुरवठादार मजूर आणि कामगारांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे संपर्क कार्यालय असलेल्या यशोधन इमारतीपासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्र हे पायाभूत विकासाचे क्षेत्र आहे. मात्र याबाबत नगर जिल्ह्यात आणि विशेषत: संगमनेर तालुक्यात लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून या क्षेत्राशी निगडित असलेले कामगार, मजूर, पुरवठादार यांची गेल्या काही दिवसांपासून उपासमार सुरू झाली आहे. तसेच बांधकाम साहित्याच्या झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे अभियंते, बांधकाम ठेकेदार, काम करण्यास कुठल्याच दृष्टीने परवडत नसल्याने त्याचा परिणाम प्रत्यक्ष जेसीबी मशीन मालक, डंपर, ट्रॅक्टर मालक व त्यांच्यावर अवलंबून असलेले खोदकाम मजूर यांनादेखील काम उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.
संगमनेर तालुक्याची वाढ झपाट्याने होत आहे. परंतु शहराच्या वाढीत महत्त्वाचा वाटा असलेले बांधकाम क्षेत्र मोडकळीस आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. या व्यवसायावर गौण खनिजाशी संबंधित जाचक शासन निर्णय मागे घेतले जात नाहीत व बांधकाम क्षेत्रास पूरक परिस्थिती निर्माण होत नाही, तोपर्यंत लाखो मजुरांचे हाल होत राहणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. यामुळे शासनाने या सर्व निर्णयांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा व हजारो संसार उध्वस्त होण्यापासून वाचवावे यासाठी या विराट महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी काढण्यात येणाऱ्या महाआक्रोश मोर्चामध्ये बांधकाम क्षेत्रातील अभियंते, शेतकरी, बांधकाम ठेकेदार, सेंट्रींग ठेकेदार, फरशी कामगार, ठेकेदार, खोदकाम, रंगकाम, इलेक्ट्रिक, प्लंबिंग, सुतार, अकुशल कामगार व या सारख्या संलग्न असणाऱ्या विविध व्यवसायावर उपजीविका असणारे सर्व मजूर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
संगमनेरमधील या व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्वांनी महाआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

