महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : पावसाळ्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्या पायाच्या स्लॅबचा राफ्ट तुटल्यामुळे म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या पुलाच्या नवीन उभारणीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या माध्यमातून लवकरच या पुलाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दिली.
विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात अनेक मोठमोठे विकास कामे मार्गी लागली असून गेल्या काही वर्षात या शहराने जलदरीत्या विकासाचे शिखर गाठले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या गेल्या. मोठमोठ्या वैभवशाली इमारतींसह हायटेक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट्य ठरत आहे. शहरात थेट निळवंडे पाईपलाईन योजनेद्वारे नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळत असून रस्ते, भूमिगत गटारे अशा पायाभूत सुविधा राबवल्या गेल्या आहेत. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ व हरित संगमनेर ठरलेल्या या शहराला नुकताच देश पातळीवरील पुरस्कार मिळाला असून दहा कोटींचे बक्षीसही मिळाले आहे.
मागील वर्षी सततच्या पावसाने म्हाळुंगी नदीवरील पूल खचला असून हा पूल साईबाबा मंदिर, गंगामाई घाट, साईनगर, पंपिंग स्टेशन या उपनगरातील रहिवासी व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच गंगामाई परिसरात फिरण्यासाठी नागरिक या पुलावरूनच ये-जा करत असतात. म्हणून हा पूल तातडीने होण्यासाठी थोरात यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली.
थोरात यांच्या मागणीला मान देऊन हा निधी नगरविकास विभागाकडून तातडीने मिळणार असून या निधीतून या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर होणार असल्याचे पापडेजा यांनी म्हटले आहे.

