महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक नियमांचा व कायद्याचा बारकाईने अभ्यास करून ही निवडणूक मुक्त, निर्भय, निष्पक्ष व अत्यंत शिस्तबद्धरीतीने पार पाडावी. तसेच या निवडणुकीच्या कामात कुठल्याही प्रकारचा कसूर खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी भोसले यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसले बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, निवडणुकीच्या कामाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. त्यानुसार बिनचूक व विहित वेळेत हे काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या कामाचे काटेकोरपणे नियोजन करत वेळेचे बंधन पाळून आपले काम करावे. निवडणुकीच्या कामाचा विषयनिहाय दैनंदिन अहवाल निवडणूक आयोगास सादर करावा लागतो. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविण्यात आलेल्या कामाचा अहवाल विहित प्रपत्रात व वेळेत आयोगास सादर होईल, या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी.
मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या
जिल्ह्यातील १४७ मतदान केंद्राची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहाणी करुन त्या ठिकाणी कुठल्याही बाबींची उणीव भासणार नाही, याची काळजी घ्यावी. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह आदी सर्व सोई-सुविधा उपलब्ध राहतील, यादृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेशासाठी रॅम्पची उभारणी करावी. तसेच मतदानाच्या दिवशी सर्व केंद्रात व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करा
निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका शांततेमध्ये व सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस विभागाने पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा. अवैधरित्या कुठल्याही प्रकारची वाहतुक होणार नाही याचीही विशेष काळजी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या.
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा
निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी तालुकानिहाय भरारी पथकांची स्थापना करावी. तसेच याबाबतचा दैनंदिन अहवाल निवडणूक आयोगास सादर होईल, यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना करत विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्यात येत आहे. तसेच मतदान कक्ष व परिसरात कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याबाबत उमेदवार, मतदारांमध्ये जागृती करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
आवश्यकतेनुसार वाहने अधिग्रहीत करा
निवडणुकीमध्ये मतपेट्याची वाहतूक, नियुक्त कर्मचाऱ्यांची ने-आण करणे, विविध भरारी पथकांना देखरेख करण्यासाठी तसेच आवश्यक निवडणूक साहित्याची वाहतूक करण्यासाठी वाहनांची आवश्यकता भासणार आहे. विविध शासकीय कार्यालयांबरोबरच आवश्यकतेनुसार खासगी वाहनांचे अधिग्रहण करण्यात यावे. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक असणारे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घेण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीस सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी यांच्यासह निवडणुकीसाठी नियुक्त प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

