खोके सरकार, बोके सरकार आणि द्वेषाने वागणाऱ्या महसूलमंत्र्यांमुळे आमची उपासमार
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : आपण अनेक वर्ष महसूल मंत्रीपद उपभोगले आहे. मात्र आपण कधीही अशा प्रकारचे राजकारण केले नाही. प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका होती. मात्र काही लोक आता आपल्या तालुक्याचे नुकसान करायला निघाले आहे. त्यांना येथील विकास बघवत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दहशतीचे राजकारण त्यांना आपल्या तालुक्यात व जिल्ह्यात करावयाचे आहे. मात्र संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा हे कदापिही होऊ देणार नाही. असा थेट इशारा माजी महसूल मंत्री व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता दिला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गौण खनिजासंबंधी घेतलेल्या धोरणामुळे बांधकाम व्यवसायाशी निगडित कामे ठप्प झाली असून या क्षेत्राशी निगडित असलेल्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये बांधकाम व्यवसायाशी निगडित असलेल्या हजारो रोजंदारी पुरुष व महिला कामगार व त्यांना रोजंदारी देणारे व्यावसायिक शनिवारी महाआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे या मोर्चाला या व्यवसायाशी निगडित राजकीय पदाधिकारी वगळता अन्य राजकीय नेत्यांची अनुपस्थिती होती.
मालपाणी लॉन्स पासून सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे भव्य सभेत रूपांतर झाले. खोके सरकार, बोके सरकार आणि महसूल मंत्री यांच्या विरोधातील घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. रोजंदारी पळविणाऱ्या सरकारवर टीका करणाऱ्या वक्त्यांमध्ये महिलांचादेखील समावेश होता.
थोरात म्हणाले, राज्यात सहा महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीस सरकार आले आणि निळवंडेसह अनेक बांधकामे बंद पडली. संगमनेरसह जिल्ह्यातील काही तालुक्यांवर जाणीवपूर्वक गौण खनिजाच्या नावाखाली अन्यायकारक निर्बंध लावले गेले. त्यामुळे शासकीय विकास कामांसह, खासगी बांधकामे, रस्ते, इमारती, घरकुले, शाळा खोल्या, अंगणवाडीची बांधकामे रखडली. गौण खनिजाच्या नावाखाली अन्यायकारक दंड करण्यात आले. बांधकामे बंद असल्याने अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडले आहे. बांधकाम हा एखाद्या विभागाच्या विकासात महत्त्वाचा भाग आहे. तोच थांबवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे.
यावेळी अरविंद पवार, किसन पानसरे, अजिंक्य वरपे, सुभाष दिघे, व्यंकटेश देशमुख, दिपाली वर्पे, अनुपमा शिंदे, निलेश कडलग, योगेश पवार, प्रा. बाबा खरात, मोहन करंजकर, प्रदीप हासे, रामहरी कातोरे, के. के. थोरात, नरेंद्र पवार, बी आर चकोर आदींनी भाषणातून सरकारवर टीका केली. महाआक्रोश मोर्चामध्ये वडार समाजाचे कामगार गाढव बिऱ्हाडासह सहभागी झाले होते.
खांदेदुखीने त्रस्त असतानाही थोरात यांनी मोबाईलद्वारे केल्या आपल्या भावना व्यक्त
महाआक्रोश मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चेकरांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित होते. हिवाळी अधिवेशना दरम्यान पडल्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू असल्याने व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थोरात यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला असताना देखील ज्यांनी मुंबईतून संगमनेरमधील मोर्चाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

