महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : नासिक-पुणे महामार्गालगत बस स्थानकाजवळ गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या घरातील व्यक्तींना मारहाण करत सुमारे अडीच लाखाच्या रोकड रकमेसह साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.
शहरातून जाणारा नासिक-पुणे महामार्ग प्रचंड वर्दळीचा असून बस स्थानकापासून काही अंतरावर सह्याद्री विद्यालया शेजारी असलेल्या व्यापारी केदारनाथ भंडारी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. महामार्गापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर पडत असलेल्या या दरोड्याची चाहूल देखील कोणाला लागली नाही. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने भंडारी यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी घरामध्ये भंडारी यांच्या पत्नी शोभना मुलगा पार्थ आणि त्याचा मित्र प्रणव असे तिघेजण होते. दरोडेखोरांनी या तिघांनाही त्यांच्या हातातील पिस्तूल, चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केली. दरोडेखोरांच्या दहशतीने घाबरलेल्या शोभना भंडारी यांनी त्यांची विनवणी सुरू केली. मात्र त्यांच्या विनवणीला धुडकावत दरोडेखोरांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेली दोन लाख साठ हजार रुपयांची रोकड, साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि विवो कंपनीचा मोबाईल भंडारी यांच्याकडून काढून घेतला.
घरातील तीनही व्यक्तींना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या दरोडेखोरांचा धुमाकूळ बराच वेळ सुरू असताना देखील आसपास कोणालाही याचा सुगावा लागला नाही. लुटीचा माल घेऊन दरोडेखोरांनी पोवारा केल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आले.
शुक्रवारी रात्री उशिराने दोन वाजण्याच्या सुमारास शोभना भंडारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्या विरोधात शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करत आहेत.
एस पी साहेब संगमनेर मधील गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक पूर्णतः संपला असून गुन्हेगारीमुळे शहर असुरक्षित बनत असल्याचे दिसत आहे. संगमनेर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून खून दरोडे आणि चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. चोर, दरोडेखोरांच्या टोळ्या दहशत निर्माण करत असताना पोलिसांना मात्र गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात पूर्णतः अपयश आले आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा तपास अद्यापही तपासावर असताना चोऱ्या करणाऱ्यांच्या टोळक्यांनी उच्छाद मांडला आहे. सततच्या घटनांनी संगमनेरकर भीतीच्या सावटाखाली आहे. जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याकडे असताना देखील संगमनेरमध्ये पोलीस खात्यात प्रभारी राज सुरू आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी खमक्या पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. शहर पोलीस दलातील एकही अधिकारी गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यास यशस्वी ठरल्याचे दिसत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरसाठी एखाद्या कार्यक्षम अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी संगमनेरकरांमधून होत आहे.

