महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
कृषी क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण प्रयोग, जलसंधारण व वृक्षसंवर्धन, एकत्र कुटुंब पध्दती, दुग्धव्यवसाय, अस्थी विसर्जनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यासारखे विविध दिशादर्शक उपक्रम सावरगाव तळने राज्याला दिले असून सावरगाव तळच्या उपक्रमाचे व शेती प्रयोगांचे अनुकरण केल्यास गावे समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी केले.
सावरगावतळ गावाने पर्यावरण, जलसंधारण, कृषी, दुधव्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रात राबविलेल्या विविध उपक्रमांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिध्द ओरेगॉन विद्यापीठाचे पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा.अँड्र्यू मिल्सन यांनी सपत्नीक सावरगावतळ गावास नुकत्याच दिलेल्या भेटीप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी गावचे सरपंच दशरथ गाडे, पोलीस पाटील गोरक्ष नेहे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समनव्यक विक्रम फाटक, तालुका समन्वयक राजेंद्र जाधव, ग्रामसेविका माधुरी शिखरे, डॉ. शंकर गाडे, प्रा. संतोष फापाळे, रंगनाथ फापाळे, प्रा. पुंजा भालेराव, मुख्याध्यापक संतोष दळे, हरीश नेहे, बाळासाहेब नेहे, अजित फापाळे, माधव नेहे, संदीप थिटमे, रवी नेहे, पोपट थिटमे, शैला थिटमे, नीता गाडे, माधुरी नेहे, प्रियांका गाडे, उज्वला नेहे यांच्यासह विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. पोळ म्हणाले, सावरगावकरांनी प्रचंड मेहनत करून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणचे केलेले नाविन्यपूर्ण काम आणि त्यातून गावात झालेला आमूलाग्र बदल, गावाने पाण्यासाठी केलेला संघर्ष व गावाने सेंद्रिय शेतीकडे केलेली वाटचाल, येथील कोरड्या चाऱ्यापासून विकसित झालेला दुग्धव्यवसाय हे सर्व कौतुकास्पद आहे. प्रत्येक गावाने पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून, शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेतीसाठी मातीचा सेंद्रिय कर्ब सांभाळने हे अत्यंत गरजेचे आहे.
त्यासाठी रासायनिक खते औषधे कमी करून जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे. हे सर्व सावरगाव तळ येथे होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. सावरगावतळ गाव प्रयोगशील असल्यामुळे सावरगावची शेती, दुग्ध व्यवसाय व गावाने राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आदर्शवत असल्याने गाव कृषी विकासाचे नवीन तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत आहे.
सावरगाव तळच्या ह्या संपूर्ण यशामागे खुप मोठा त्याग असून गावकऱ्यांच्या प्रामाणिक कष्टातुन हे सर्व साध्य झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी सावरगावतळचा आदर्श घेतला तर त्यांना आपले गाव समृद्ध करण्यासाठी वेळ लागणार नाही.
यावेळी प्रा. अँड्र्यू मिल्सन यांनीही आपले विचार व्यक्त करतांना गावाने पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच गावची सेंद्रिय व विषमुक्त शेतीकडील वाटचाल, प्रतिकूल परिस्थितीत येथे विकसित झालेला आदर्श दुग्धव्यवसाय, येथील एकत्रीत कुटुंबपद्धती आणि शिक्षणाबाबतची जागृती, गावची एकात्मता, आपुलकी व एकमेकांप्रति असलेले प्रेम हे सर्व पाहून अक्षरशः भारावून गेलो असून सावरगावतळ हे गाव माझ्या सदैव हृदयात राहील अशी भावना व्यक्त केली.
डॉ. पोळ आणि प्रा. अँड्र्यू मिल्सन यांनी सावरगावचा ऑक्सिजन पार्क, प्रयोगशील शेती, एकत्र कुटुंब पद्धती, गव्हाच्या भुसापासून चालू असलेला आदर्शवत दुग्धव्यवसाय, समान पाणीवाटप उपक्रम, मृत व्यक्तीचे त्याच्या घरासमोर अस्थी व रक्षाविसर्जन करून तेथे केले जाणारे वृक्षारोपणाचा उपक्रम, गावाने केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संगणक कक्ष प्रयोगशाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशीही संवाद करून तसेच सेंद्रिय व जैविक पद्धतीने विषमुक्त शेती करणाऱ्या साईकृपा महिला शेतकरी गटातील महिलांशीही परिसंवाद केला.

