महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर – संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने तसेच नव्याने हा रस्ता खड्डे मुक्त होत असल्याने या रस्त्यावरून वाहन चालक वेगाने वाहने चालवत आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातात वाढ झाली असल्याने अपघात रोखण्यासाठी या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. संगमनेर शहरातील दिल्ली नाका ते समनापुरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता दुरुस्त झाल्याने व रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावताना दिसत आहे. यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.
या अपघातामध्ये अनेक लोक जखमी होत आहे. या मार्गावरील वेगवेगळ्या चौकामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दिल्ली नाका ते गणपती मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधक टाकणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसरात त्वरित गतिरोधक बसविण्यात यावे, यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी तिथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या निवेदनाचे दखल घेऊन आठ दिवसाच्या आत या मार्गावर गतिरोधक टाकावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि या परिसरातील स्थानिक लोक रास्ता रोको आंदोलन करतील.
मनसे शहर उपाध्यक्ष अभिजित घाडगे, बाळासाहेब जाधव, देविदास गांडोळे, शुभम गुंजाळ, सतिश धूमसे, तुकाराम सातपुते, यश रोकडे, सार्थक गुंजाळ, गोकुळ पानसरे, निखिल कबाडे, सुमित उनवणे, आदेश उनवने, प्रवीण गुंजाळ, भारत गुंजाळ आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

