महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर नगरपालिका हद्दीतील स्वामी समर्थ मंदिरालगत म्हाळूंगी नदीवरील खचलेल्या पुलाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता याप्रकरणी कोणावर कारवाई होते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात म्हाळूंगी नदीला आलेल्या पुरामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिराला जोडणारा पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरून परिसरातील नागरिकांना ये जा करता येत नाही. या पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत असतानाच माजी उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस जावेद जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार करत मानवनिर्मित चुकांमुळे पूल खचला असल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.
जहागीरदार यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीत २० वर्षापूर्वी म्हाळूंगी नदीवर स्वामी समर्थ मंदीरजवळ बांधण्यात आलेला पुल मानव निर्मित चूकांमुळे शतीग्रस्त झालेला असल्याचे म्हटले होते. संगमनेर नगर पालिकेची भूमीगत गटार योजना मंजूर होऊन त्याचे काम सुरु करण्यात आले होते. या भूमीगत गटार योजनेतील गटारीचे पाईप क्रॉसींग करताना संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे व ठेकेदारांशी मिलीभगत असल्यामुळे पाईप लाईन क्रॉसींगचे काम करताना म्हाळूंगी नदीपात्रातील पुलाच्या फौंडेशनला धक्का लावत ते डॅमेज करण्यात आले.
भूमीगत गटार योजनेतील पाईप लाईनचे काम करताना कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. पुलाच्या फौंडेशनला पाईप लाईनच्या कामांमुळे धक्का लागल्याने पुल कमकुवत झाला होता. त्यातच पावसाळ्यात म्हाळूंगी नदीला पाणी आल्यामुळे पूल खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सदरचा पूल मानवी चुकांमुळे क्षतीग्रस्त झाला असून संगमनेर नगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेमुळे या पुलाचे नुकसान झाले आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांची तसेच या परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या संगमनेरकरांची मोठ्या प्रमाणात या पुलावरून वर्दळ असते. खचलेल्या या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याची व दोषी असलेल्या पालिकेच्या बांधकाम विभागातील वरीष्ठ अधिकार्यांसह पालिकेचे पदाधिकारी व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
जहागीरदार यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सदर पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन हा पूल नेमका का खचला? याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याने पुलाच्या पायाला धक्का पोहोचवत या पुलाखालून देण्याचे पाईप नेण्यासाठी आग्रही असलेल्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याने व कारवाईचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागणार असल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

