महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर
देश हिताचा व लोकशाही वाचवण्यासाठीचा काँग्रेसचा विचार असून तो प्रत्येकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित हाथसे हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार लहू कानडे होते. तर व्यासपीठावर श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे, दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष किरण काळे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, हेमंत ओगले, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, करण ससाने, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव म्हस्के, सचिन गुंजाळ, संगमनेरचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी लोकशाही वाचवण्यासाठी सुरू केलेली भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली. महाराष्ट्राच्या समन्वयाची जबाबदारी आपण सर्वांच्या सहकार्यातून यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्रात या यात्रेला अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. संत व समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र असल्याने पुरोगामी विचार येथे रुजला आहे. महाराष्ट्रातील यात्रेचे व शेगाव सभेच्या नियोजनाचे देशपातळीवर कौतुक झाले.
देशात सध्या महागाई व बेरोजगारी हे मूलभूत प्रश्न असून या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी इतर प्रश्न निर्माण करून विविध चैनलवर दाखवले जात आहेत. सध्या देशात जाती धर्माच्या नावावर सुरू राजकारण सुरू असून हे अत्यंत घातक आहे. जनतेच्या हिताच्या कोणताही निर्णय होत नाही. प्रेमाचा एकतेचा व लोकशाहीचा संदेश देण्यासाठी हाथसे हाथ जोडो हे अभियान असून गावोगाव हे अभियान अत्यंत यशस्वीपणे राबवा.
आगामी काळ हा महाविकास आघाडीचाच असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून शिवसेना तोडणे हे महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला सहन होणारे नाही. याचबरोबर काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून हाच आपला विचार आहे. हाथ से हाथ जोडो या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार लहू कानडे म्हणाले, काँग्रेसला मोठी ऐतिहासिक परंपरा असून काँग्रेसने देशाला गुलामगिरीतून बाहेर काढले आहे. काँग्रेसने स्वातंत्र्य मिळून दिले. स्वातंत्र्यांने संविधान दिले आणि संविधानाने बंधुता व समता दिली. मात्र काही लोक धार्मिक तेढ निर्माण करून विषमता पेरण्याचे काम करत आहे. केंद्र व राज्य सरकार स्वायत्त संस्था हाताशी धरून कार्यकर्त्यांना भीती दाखवून त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र राहुल गांधी यांनी डरो मत हा संदेश दिला आहे. विविधतेतील एकता हे देशाचे वैशिष्ट्य असून सर्वांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात हाथसे हाथ जोडो हे अभियान यशस्वीपणे राबवा.
राजेंद्र नागवडे, सचिन गुजर, करण ससाने, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुंजाळ आदींची भाषणे झाली. यावेळी सोन्याबापु वाकचौरे, सुरेश झावरे, प्रताप शेळके, अविनाश दंडवते, विक्रम नवले, आप्पा काकडे, राहुरीचे बाळासाहेब आढाव, मनोज गुंदेचा, सचिन चौगुले, अरुण नाईक, अमृतराव धुमाळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे व सचिन गुंजाळ यांनी केले. शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी आभार मानले
हाथ से हाथ जोडो अभियान
भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने हाथसे हाथ जोडो हे अभियान सुरू करण्यात आले असून या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाशी संपर्क करण्यात येणार असून काँग्रेसचा विचार पोहोचवला जाणार आहे. याचबरोबर विविध बैठका, पदयात्रा, पत्रक वाटप, कॉर्नर बैठक, एलईडी व्हॅन मधून माहितीपट, गणवाईज बैठका, तालुका मेळावा, जिल्हा मेळावा यांसह मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सोशल मीडिया ऍक्टिव्ह करून भारत जोडो अभियानासह काँग्रेसचे उपक्रम अधिकाधिक तरुण व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष अभियान राबवले जाणार आहे.

