महाराष्ट्र संवाद न्यूज
देशातील जेष्ठ नागरिकांचा विचार करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने प्रथमच देशाला मिळाला. राष्ट्रीय वयोश्री योजनेपासून ते जलजीवन मिशन पर्यतच्या सर्व योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्नच केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन नगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थींना साधन साहीत्याचे वाटप करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा. विखे पाटील यांनी स्व. अशोकराव मोरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांना सुमनांजली अर्पण केली. कार्यक्रमास भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. अशोक इथापे, वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, रोहीदास डेरे, डॉ. सोमनाथ कानवडे, अशोक कानवडे, संजय मोरे, अमोल कानवडे, अमोल खताळ, राहूल भोईर, वैभव लांडगे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विखे म्हणाले, नगर जिल्ह्यात या योजनेतून ४२ हजार जेष्ठ नागरिकांना साधन साहीत्याचा लाभ झाला. लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदीनी मोफत साहीत्य देण्यासाठी सुरू केलेली योजना ग्रामीण भागातील वयोवृध्दापर्यत पोहचविण्यात मोठे समाधान मिळाले. केंद्र सरकाराने समाजातील प्रत्येक घटकासाठी योजना सुरू केल्या आहेत.
यामध्ये ग्रामीण भागात जलजीवन मिशन सारख्या योजनेतून नळाद्वारे पाणी देण्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला. दिलेल्या सर्व आश्वासनाची पूर्तता करताना २०२४ सालापर्यत प्रत्येक गावात या योजनांची काम पूर्ण होतील. हे काम फक्त केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी निर्णयामुळे होत असून श्रेय कोणीही घेत असले तरी यामागे पंतप्रधानांची दूरदृष्टी आहे. कोविड संकट असो की त्यानंतर झालेले मोफत लसीकरण मोफत धान्य आणि किसान सन्मान योजनेतून मिळणारे सहा हजार रुपये देण्याचा निर्णय करणारे पंतप्रधान मोदीजी एकमेव असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर ज्या गतीने निर्णय होत आहे त्यातून सर्व सामान्य माणसाला दिलासा मिळत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निधीची उपलब्धता होत असून मागील सरकारमध्ये फक्त वेळ वाया घालविण्याचे काम झाले. उतर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांना पाचवी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याकडे लक्ष वेधून खा. विखे म्हणाले यामुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम राज्य सरकारकडून झाले.
यापुर्वी तालुक्यात फक्त मंत्र्याचे तळवे चाटून वाळू माफीयांचा हैदोस होता. या वाळूच्या पैशाने एक पिढी बरबाद केली. सामाजिक वातावरण कलुषित केले. शासनाचा महसूल बूडविणाऱ्या व्यक्ति विरोधात केलेली कारवाई सूडाच्या भावनेतून कशी म्हणता असा सवाल करून या माफीया राजच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात हैदोस सुरू होता असा थेट आरोप त्यांनी केला.
यापुढे महसूलचे अधिकारी माफीयांच्या मागे फिरताना अधिकारी दिसणार नाहीत. सामान्य माणसासाठी काम करतील. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळू धोरणाचा मसूदा नुकत्याच झालेल्या महसूल परीषदेत तयार झाला असून लवकरच याबाबत निर्णय होवून सामान्य माणसाला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल.
निळवंडेच्या कामात खोडा घालू नका या माजी मंत्री थोरातांच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना खा. विखे म्हणाले की, आजारी असल्यामुळे त्यांना काय काय बदल आणि कोणामुळे निर्णय झाले हे माहीती नव्हते. आता त्यांना सर्व माहीती मिळेल आणि महीन्याभरात त्यांची वक्तव्य बदलतील असा मिश्कील टोला लगावला.

