महाराष्ट्र संवाद न्यूज
भाऊसाहेब वाकचौरे ॥ अकोले
आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पैठण येथील मुलींच्या आश्रम शाळेत व्हायरल इन्फेक्शनमुळे तब्बल दीडशे विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. यातील काही विद्यार्थिनी आपल्या गावी परतल्या असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोले तालुक्यातील पैठण येथे असलेल्या मुलींच्या आश्रम शाळेमध्ये जवळपास चारशे विद्यार्थिनी असून दोन दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने साधारणत: दीडशे विद्यार्थिनींना थंडी, ताप, उलट्या व जुलाबाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तातडीने कोतुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यातील काही विद्यार्थिनींना लोणी आणि संगमनेर येथे उपचारासाठी नेण्यात आले.
या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाची देखील धावपळ उडाली. बहुतांशी विद्यार्थिनींना उपचारानंतर आपल्या घरी पाठविण्यात आले असून आश्रम शाळेला देखील सुट्टी देण्यात आली आहे. ऐन परीक्षेच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय पैठण गावात देखील व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर येत आहे.
हे इन्फेक्शन नेमके कोणत्या कारणामुळे पसरले याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र याची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दरम्यान हे इन्फेक्शन नेमके कशामुळे पसरले याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. मात्र यासंदर्भात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समिती उदासीन असल्याचे दिसून आले आहे. आश्रम शाळेमध्ये स्त्री अधिक्षिकेची जागा गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असून ही जागा भरावी यासाठी तत्कालीन प्रकल्प अधिकारी, प्रकल्प समिती यांना वारंवार कळवून देखील या मागणीकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
दरम्यान आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचे जेवण नाशिक येथून येत असते. त्यामुळे चार ते पाच तासानंतर हे जेवण दिले जात असल्याने त्यातून देखील विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
● दोन दिवसांपूर्वी सात-आठ मुलींना थंडी ताप आल्याने त्यांना औषधोपचारासाठी कोतुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने साधारणता दीडशे विद्यार्थिनींना हा त्रास जाणवल्याने त्यांना लगेचच औषधे देण्यात आली. पालकांनी आपल्या मुलांना घरी नेल्याने शाळेला सुट्टी देण्यात आली आहे मात्र काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे पैठण आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विष्णू नेहे यांनी सांगितले.
□ पैठण आश्रम शाळेतील मुलींना थंडी तापाचा त्रास झाला असून मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना औषधोपचार दिले आहेत. मी स्वतः आश्रम शाळेला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आहे. राजन पाटील, प्रकल्प अधिकारी.

