सुनिल नेवासकर ॥ संगमनेर
संत निरंकारी मिशन आणि संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व प. पु. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशाने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम रविवारी (ता. २६) सकाळी ७ ते १२ या वेळेत विजयघाट, गंगामाई परिसर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रकल्प अंतर्गत विजयघाट व नदीपात्राची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलसंरक्षण हा असून यामध्ये प्रामुख्याने पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरण आणि स्वच्छ करण्याप्रती जनजागृती करणे हा आहे. हा उपक्रम संपूर्ण भारतात ११०० ठिकाणी राबविला गेला. यामध्ये समुद्र किनारे, नद्या, झरे, तलाव, बंधारे, विहिरी, बारव, पाण्याच्या टाक्या इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
संगमनेर शाखेच्यावतीने राबविलेल्या या उपक्रमात संगमनेर शाखेचे मुखी प. पु. डॉ. अर्जुन जाधव, सेवादल संचालक प. पु. सोमनाथ भोर व सेवादल शिक्षक प. पु. दत्ता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सेवादल, सर्व साथसंगत, परिसरातील नागरिक, पत्रकार यांनी अनमोल असे योगदान दिले. सकाळी ७ वा. सेवादल व साथसंगत यांनी आपली सेवा सुरु केली. संपूर्ण परिसर स्वच्छ करून आपल्या कर्माद्वारे त्यांनी सेवेचे महत्त्व जनतेला पटवून दिले.
या उपक्रमासाठी संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सफाई विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती देण्यात आली.

