महाराष्ट्र संवाद न्यूज
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यासमोर आज अनेक अडचणी उभ्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी उद्योजक धार्जिन्या सरकारने पुढाकार घ्यावा. वीज जोडण्या तोडू नये, कांद्याला भाव वाढ मिळावी, महागाई कमी करावी आदी मागण्यासाठी शनिवारी (४ मार्च) काँग्रेसच्यावतीने बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे व तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी दिली.
शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे म्हणाले, शनिवारी सकाळी नऊ वाजता हे आंदोलन होणार आहे. देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी असून सरकारकडून शेतकऱ्यांना काहीही दिले जात नाही. उलट उद्योजकांना कोट्यावधी रुपयांची माफी दिली जाते.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या कष्टातून उभ्या केलेल्या शेती पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र जुलमी सरकार शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडत आहेत. एकीकडे शेतमालाला भाव नाही, कांद्याचे भाव कोसळले अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला असताना वीज जोडण्या तोडणे चुकीचे आहे.
त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची वेद जोडणे तोडू नये, कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव द्यावा, विविध शेतीमालासाठी हमीभाव जाहीर करावा, महागाई कमी करावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. रास्ता रोको आंदोलनामध्ये काँग्रेससह पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्रपक्ष सहभागी होणार आहेत.
संगमनेर शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

