महाराष्ट्र संवाद न्यूज
भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे अमर कतारी, शिर्डी मतदार संघातील काँग्रेसचे नेते सुरेश थोरात आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कांद्याचा प्रश्न सध्या अवघड झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या खर्चातून कांदा पीक उभारतो. मात्र कमी भाव झाल्याने हे सर्व शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. मविआ सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र सध्याचे सरकार फक्त मेट्रोसिटी आणि मेट्रोवर भर देत असून शेतकऱ्याकडे दुय्यम भावनेतून पहात आहे. कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून नाफेडकडून कुठेही खरेदी सुरू नाही. कापूस, सोयाबीन, भाजीपाला, वांगे, कांदे आदी सर्व पिकांचे भाव पडले आहेत.
याचबरोबर सध्या उन्हाळा वाढत असून सरकारकडून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेस होते त्यावेळी, हेच भाजपवाले मोफत विजेच्या घोषणा देत होते. आता मोफत वीज देत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
डॉ. तांबे म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्याची अत्यंत वाईट अवस्था असताना श्रीमंताच्या हिताचे निर्णय भाजप सरकारकडून घेतले जात आहे. कांदा नगदी पीक आहे. मात्र कांदा आयातीचे धोरण सरकारने घेतले आहे. गहू, साखर आयात करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. कांदा हे शाश्वत पीक असल्याने अनेक शेतकरी कांदा उत्पादन करत असतात. ज्यावेळी कांदा उत्पादन जास्त होते त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करा. विजेचा धोरण निश्चित करा. दिवसा बारा तास वीज द्या अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, माधवराव कानवडे, रामहरी कातोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कांद्याला हमीभाव द्या, शिंदे सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणांनी संगमनेर बसस्थानक परिसर दुमदुमून गेला. यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यासाठी अनुकरणीय पॅटर्न
रास्ता रोको हा शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी आहे. मात्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास नको, म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांनी रास्ता रोकोऐवजी धरणे आंदोलन करून आपल्या भूमिका मांडावी अशी सूचना कार्यकर्त्यांना केल्याने लोकांना वेठीस न धरता लोकशाही व न्याय पद्धतीने आपल्या मागण्या मांडण्याची ही पद्धत नक्कीच राज्यासाठी अनुकरणीय ठरणार आहे.

