महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर
संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. खचलेल्या या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेने केली आहे. अन्यथा यासाठी संस्थेच्या वतीने संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे.
स्वामी समर्थ मंदिरालगत असलेल्या या पुलावरून साई मंदिर, प्रवरा नदी, गंगामाई घाट, पंपिंग स्टेशन, कासारवाडी, साईनगर, घोडेकर मळा, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालय, मालपाणी हेल्थ क्लब आदी ठिकाणी ये-जा करता येते. साधारणत: ऑक्टोंबरमध्ये या भागाला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल मानवनिर्मित चुकांमुळे कसला आहे. जवळपास सहा महिन्याहून अधिक काळ हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची तसेच या भागात येणाऱ्या-जाणाऱ्यांची तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. मोठ्या लोकसंख्येचा हा भाग गणला जातो.

असे असले तरी, पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नगरसेवक, राजकीय नेते, आमदार, खासदार या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने बघताना दिसत नाही. श्रेय वादात हा विषय अडकत चालला असल्याची चिन्ह दिसत आहे. सध्या पालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर हा प्रश्न सुटू शकतो. मात्र त्यांनाही या प्रश्नात स्वारस्य नसल्याचे दिसते.
त्यामुळे या प्रश्नात आता संघर्ष सामाजिक संस्थेने लक्ष घातले असून पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने त्वरित करावे. अथवा यासाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास या प्रश्नासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठे जन आंदोलन उभे केले जाण्याची चिन्ह आहेत.
पूल नेमका कसा तुटला…
म्हाळुंगी नदीवरील हा पूल अनैसर्गिक पद्धतीने तुटला आहे. एसटीपी प्लांटच्या ड्रेनेजचे काम करताना या फुलाचे फाउंडेशन तोडले गेले. याकडे देखील शासकीय पातळीवर दुर्लक्ष होतांना दिसत आहे. वास्तविकता संबंधित दोषींवर कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही घडले नाही. मात्र हा विषय बाजूला ठेवला तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या पुलाचे काम त्वरित करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाने हे काम तातडीने करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संग्राम जोंधळे, उपाध्यक्ष अब्दुल्ला हसन चौधरी, दैनिक प्रवरातीरचे संपादक शिवपालसिंह ठाकुर, केशवराव दत्ता कांडेकर, माधव गिरी तसेच साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

