महाराष्ट्र संवाद न्यूज
नाशिक
समस्या नसतील तर तिथे जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. काही समस्या मार्गी लागतात तर काहींवर उपाय नसतो. अशा समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी भावनिक आधार महत्वाचा आहे. समस्या कितीही असुद्या त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष असल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. नाती जपली पाहिजेत, मित्र जपले पाहिजेत, असा उपदेश प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास यांनी केला.
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एसएमबीटीचे मुख्य विश्वस्त डॉ. सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
शुक्रवारी (दि ०३) जगभरात प्रेरणादायी वक्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे ते गौर गोपालदास यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘लाईफ’स अमेझिंग सिक्रेट्स’ असा या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांना आयुष्य आनंदित आणि सकारात्मक जगण्याचा मार्ग अगदी साध्या सोप्या भाषेत गौर गोपालदास यांनी सांगितला. त्यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन यशस्वी जीवनाचे धडे दिले.
ते म्हणाले, ‘आयुष्यात परिस्थिती बिकट असेल, अनेक समस्या असतील. त्यांना दूर सारणे आपल्यासाठी अवघड होऊन बसलेले असेल तर आपण समस्येपेक्षा मोठे झाले पाहिजे. आपण एकदा का मोठे झालो की समस्या आपोआपच लहान वाटायला लागतात. आयुष्यात अशा व्यक्तीचा शोध घ्या, ज्यांच्याकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल. नकारात्मक व्यक्तींपासून चार हात दूर राहा आणि सकारात्मक व्यक्तींना कायम आपल्यासोबत ठेवले पाहिजे.
तुम्हाला वाटत असेल की, आयुष्य सरळ असावे, आयुष्यात चढ-उतार येऊ नयेत. पण, असे सरळ आयुष्य म्हणजे मयताचे किंवा प्रेताचे आयुष्य असते. आयुष्यात चढ-उतार असलेच पाहिजेत. जेव्हा आयुष्य उतरणीला लागते. आनंद फुलपाखरासारखा जवळचा वाटतो, परंतु जेव्हा आपण ते पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्यापासून दूर जाते. त्यामुळे तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टीकोन ही जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहीजे.
आयुष्यात समस्या एका ठिकाणी असते पण दुसरी अशी अनेक ठिकाणे असतात जिथे सर्वकाही चांगले आणि सकारात्मक असते. मनाला समस्याकडे वारंवार नेण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींचा विचार केल्यास समस्या आपोआप सुटतील असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आणि उदाहरणे देत गौर गोपालदास यांनी उपस्थित श्रोत्यांना आनंदी आयुष्य जगण्याचे गमक सांगितले.
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट संचलित एसएमबीटी आयएमएस अॅण्ड आरसी मेडिकल कॉलेज, एसएमबीटी आयुर्वेद कॉलेज, एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी, डेन्टल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी कॉलेज ऑफ नर्सिंग, एसएमबीटी हॉस्पिटल यांचा संयुक्त वार्षिकोत्सव एसएमबीटी ट्रस्टच्या धामनगाव, घोटी कॅम्पसमध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे हा फेस्ट होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे यंदाच्या फेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.
एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलची सुरुवात अतिशय शून्यापासून झाली. याठिकाणी कुणी फिरतही नव्हते, तेव्हा इथे आपण हॉस्पिटल सुरु केले. काही दिवसानंतर याठिकाणी डॉ. हर्षल आले, त्यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने आज जो बदल दिसतो आहे तो करण्यात यश मिळवले आहे. आज या हॉस्पिटलची ख्याती सबंध महाराष्ट्रात आहे. अभिमान वाटावा असे कार्य एसएमबीटीच्या माध्यमातून होत आहे. सर्वांना हे कार्य असेच पुढे सुरु ठेवण्यासाठी शुभेच्छा तसेच विद्यार्थ्यांनाही भावी वाटचालीसाठी यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा दिल्या.

