महाराष्ट्र संवाद न्यूज
लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षाने जनतेच्या सेवेकरांची संख्या अचानक वाढत असते. सेवेची बाधा झालेले हे लोक घरोघरी जात सेवेची संधी देण्याची मागणी करतात मात्र, त्यानंतर महिनाभरात ही साथ ओसरते आणि हे सेवेकरी जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित करत याचे उत्तर पाच वर्षांनी मिळत असते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवानिधी संस्थेच्यावतीने ‘सेवा भवन’ प्रकल्पाच्या इमारतीचे पुण्यामध्ये शनिवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गांधी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव, समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र सातारकर, फाउंडेशनचे संचालक महेश लेले, संस्थेचे कोषाध्यक्ष माधव माटे यावेळी उपस्थित होते. यावेळी भागवत यांच्या हस्ते ‘अहर्निश सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
भागवत म्हणाले, देशात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा इतकी संपन्नता व नीतिमत्ता होती. मात्र मध्यंतरीच्या आक्रमण आणि पारतंत्र्याच्या काळानंतर समाजात दुःख निर्माण झाले. ते दूर करण्यासाठी जनकल्याण समितीसह विविध सेवा संस्था उभ्या राहिल्या. त्यातून संघाच्या आधारे देशात व्यापक सेवा कार्य सुरू आहे.
सेवेबद्दल समाज कदाचित तुम्हाला शाबासकी देईल, उपेक्षा करेल किंवा विरोधी करेल. मात्र तुम्ही कोणती आशा न ठेवता समाजकार्य केले पाहिजे. भीतीपोटी, स्वार्थापोटी, सक्तीपोटी केल्या जाणाऱ्या सेवेला बेगडी स्वरूप प्राप्त होत असते.

