महाराष्ट्र संवाद न्यूज
कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले असताना आता कांद्याचा प्रश्न पेटला असल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
कमी कांद्याच्या उत्पादनामुळे जगातील अनेक देशांना रडवत असलेला कांदा आता मात्र आपल्या राज्यात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन झाले असतानाच आता राज्यात कांदा प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होताना दिसू लागला आहे. एकीकडे विरोधकांनी या प्रश्नी सभागृहात आवाज उठवताना आता आंदोलने देखील सुरू केले आहे.
अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न झाल्याने शेतकऱ्यांचा सरकार विरोधात आक्रोश दिसू लागला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनावर कांदे फेकल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून ही कांदा फेक करण्यात आल्याची माहिती समजत आहे.
जागतिक बाजारपेठेत अभूतपूर्व कांदा टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे परदेशात कांद्याला सोन्याचा भाव मिळत आहे मात्र आपल्याकडे सरकारने लादलेल्या निर्यात बंदीमुळे हाच कांदा आता शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार यांना देखील नाशिक मधील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी घेराव घातल्याचा प्रकार घडला आहे. त्या लासलगाव येथील नाफेड कांदा खरेदी केंद्रावर कांदा खरेदीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.
यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना पवार म्हणाल्या, मी नाफेडची खरेदी करण्यासाठी आग्रह केला. तुम्ही मात्र विरोध करत आहात. आजपर्यंत सरकार लाल कांदा खरेदी करत नव्हते. आता तो आम्ही खरेदी करत आहोत. केंद्र सरकारने पहिल्यांदाच लाल कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक पातळीवरचे कांद्याचे जे भाव आहेत त्या भावाने कांदा खरेदी करा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला असता त्या म्हणाल्या; जागतिक पातळीवर कांद्याला मागणी नाही. लाल कांदा लवकर खराब होतो. शेतकरी संघटनेने निवेदन द्याव की, नाफेड काही कामाच नाही, आम्ही नाफेडची कांदा खरेदी बंद करू.

