होळी विशेष ● रवींद्र एरंडे
अस्सल संगमनेरी बोंबाबोंब ऐकायची आणि सहन करायची असेल तर, संगमनेरच्या होळीमध्ये सामील व्हायला हवं. बदलत्या काळानुसार होळी उत्सवात बदल झाला असल्यास तरी जुन्या होळीच्या आठवणी कायम आहेत.
होळी साजरं करणारं मंडळ आठवड्यापासूनच तयारीला लागतं. पूर्वी लहानपणी घरोघरी फिरून गोवर्या (गवर्या) मागीतल्या जात. वखारीतून लाकडं आणली जात, सायंकाळी होळीभोवती शेणसडा, रांगोळी, पूजा करुन होळी पेटवली जायची. मग गल्लीतल्या बायाबापड्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायच्या. तांब्यातील पाण्याने प्रदक्षिणा मारायची. खोबर्याची वाटी जाळायची.त्याचा प्रसाद वाटायचा.
“होळीच्या गवर्या पाच पाच…होळीपुढं नाच नाच” असा सूर निघायचा. तो साधारणतः साडे आठ पर्यंत… नंतर होळकरी पोरं टप्प्याटप्प्याने घरी जेवण करुन यायची आणि मग खरा शिमगा सुरु व्हायचा. आम्ही संगमनेर नगरपालिकेसमोर राठी सरांच्या समोरील वाड्यात रहायचो. आमच्या पोरांची होळी राठी सरांच्या घरासमोर लहानशा म्हसोबा मंदिरासमोर रचली जायची. रात्री साडेनऊला होळीभोवती बोंबाबोब सुरु व्हायची. मग रस्त्याने जाणारा सायकलवाला… पापडवाला… पोरांना कोणीही चालायचा… आणि मग संगमनेरच्या गावराणी तालासुरातल्या शिव्या सुरु व्हायच्या.
खरं तर या शिव्या या “ओव्या ” वाटायच्या. इतकं छान यमक जुळवलं जायचं, संस्कारी पोरांचा सूर बसका तर बिनधास्त पोरांचा सूर टिपेला पोहोचायचा. रात्री ११ च्या पुढे कोणाची लाकडं, कोणाची खाट, कोणाची ओसरीतली लाकडी वस्तू, पोरं दोन, तीन दिवस अगोदर सर्व्हे करीत. आणि होळीच्या रात्री पत्र्यावर, धाब्यावर चढून ही सामग्री होळीसाठी आणली जायची. एखाद्याला जाग आली की तो शिवीगाळ करीत होळीपर्यंत पळत यायचा. आणि ढणाढणा पेटत असलेली बाज पाहून पोरांना शिव्या हासडायचा. त्याची पाठ वळली रे वळली की, “बाजेवाला लई शाहाणा……xxxxxx” चा गजर व्हायचा. आणि तो गृहस्थ सामूहिक शिव्यांचा प्रसाद खाऊन गपगुमान घरी जायचा.
रात्रीचा हा शिमगा बारा एकपर्यंत चालायचा. आणि मग सकाळी होळीतल्या विस्तवावर पाणी तापविण्यासाठी लगबग उडायची. अर्थात, तेव्हा शिमगा, होळी, बोंबाबोंब सहन करणारी माणसं होती. सहनशीलता होती. टिंगल, मस्करी सहन केली जायची, रात्री घरातली लाकडी वस्तू गायब झाली तरी, मनात राग न ठेवता, “कोणाचं काय चोरलं ?” आणि कशी मजा आली. या गप्पा सकाळी रंगायच्या.
एक मात्र खरं, होळीची बोंबाबोंब केलेलं संगमनेरचं पोरगं जगात कुठंही गेलं तरी, समोरच्याला जशास तसं उत्तर द्यायला मागंपुढं पहात नाही. कारण शिव्यांच्या ओव्या करुन त्या समोरच्या व्यक्तीला जहरी शब्दात पाजण्याचं बाळकडू त्याने बालपणीच प्राशन केलेलं असतं.

