महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असताना केवळ भारत भूमीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्र हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी शपथ घ्यायला हवी. परकीयांनी आपल्या देशातील संपत्ती लुटली मात्र त्यांना आपल्या मनगटातील बळ लुटता आले नसल्याने या बाळाच्या बळावर आता आपण छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्याचे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले.
शिवजयंती युवक उत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीस प्रारंभ होण्यापूर्वी कालीचरण महाराज बोलत होते. उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
कालीचरण महाराज म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापन करत छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमण थोपविले मात्र देशाचे अनेक भूभाग आक्रमकांनी गिळंकृत केले आहे. छत्रपतींच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी एकजुटीने उभे राहत असताना परकीयांनी गिळंकृत केलेला भूभाग परत मिळविण्याची गरज आहे.
संगमनेर शहरामध्ये तसेच उपनगरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने शहर भगवेमय झाले होते. छत्रपतींवरील पोवाड्यांनी परिसर दणाणून गेला. मिरवणुकीमध्ये शेकडो तरुण-तरुणींनी भगवे फेटे परिधान करत आपल्या दुचाकींना भगवे ध्वज बांधत रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. कालीचरण महाराजांचे रॅलीतील उपस्थिती मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचाच उत्साह वाढविणारी ठरली.

