महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
कोल्हार घोटी राज्यमार्गावर संगमनेर शहरा नजीकच्या मंगळापुर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ दोन दुचाकी आणि दुधाच्या टँकरच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघा तरुण मित्रांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातातील तरुण चिखली गावचे असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात ऋषिकेश उमाजी हासे (वय २०), सुयोग बाळासाहेब हासे (वय २०), निलेश बाळासाहेब सिनारे (वय २६) या तिघा मित्रांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या संदीप भाऊसाहेब केरे (वय ३२) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी रात्री साडेआठ पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. दोन दुचाकीवरून ऋषिकेश उमाजी हासे (वय २०), सुयोग बाळासाहेब हासे (वय २०), निलेश बाळासाहेब सिनारे (वय २६) आणि संदीप भाऊसाहेब केरे (वय ३२) हे चौघे मित्र आपल्या चिखली गावाकडे अकोलेच्या दिशेने परतत होते.
चौघेही शहरालगतच्या मंगळापूर जवळील बर्फ कारखान्यासमोरून जात असताना संगमनेरकडे येत असलेल्या दुधाच्या टँकरची आणि दुचाकींची जोराची धडक झाली. अपघातानंतर टँकर चालक टँकर सोडून पसार झाला. अपघाताच्या भीषण आवाजाने परिसरातील लोक अपघातस्थळी जमले. तातडीने घटनास्थळी आलेल्या पोलीस पथकाने व नागरिकांनी सर्वांना रुग्णालयात हलविले. मात्र घटनास्थळी तिघा तरुण मित्रांचा दुर्दैवी अंत झालेला होता तर एका गंभीर जखमीला संगमनेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले असून तिघाही तरुणांवर शनिवारी दुपारी त्यांच्या चिखली गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी नातेवाईकांच्या तक्रारीवरून टँकर चालका विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

