महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
सुरत:
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने मानहानी प्रकरणी दोषी ठरविले असून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या खासदारकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राहुल गांधी यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
खासदार गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा करताना न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला आहे. या खटल्यावेळी राहुल गांधी स्वतः न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यावर आज निकाल देताना गांधी यांना दोषी ठरवल आहे. गांधी यांना दोषी ठरविल्यानंतर अवघ्या वीस मिनिटात त्यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली.
चार वर्षांपूर्वीच्या म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील हे प्रकरण आहे. खासदार राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून टिप्पणी करताना “चोरों का सरनेम मोदी क्यू होता है” असे विधान केले होते. गांधी यांच्या या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. न्यायालयाच्या निकालानंतर हे विधान गांधी यांना आता चांगलेच भोवले आहे.
नेमके काय प्रकरण होते
2019 च्या लोकसभा निवडणुकी वेळी राहुल गांधी यांनी कर्नाटकामध्ये मोठी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच निरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांची आडनाव एकसारखी कशी? सर्व चोरांची आडनावे मोदी असतात का? असा सवाल केला होता. गांधी यांच्या या विधानावर आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात गांधी समुदायाचा अपमान झाल्याचा मानहानीचा दावा दाखल केला होता. यावर सुरतच्या जिल्हा कोर्टाने राहुल गांधी यांच्या विरोधात निकाल देत त्यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली.
न्यायालयात गांधी म्हणाले होते…
सुनावणी दरम्यान राहुल गांधींनी न्यायालयात सांगितले की, अशी टिप्पणी करण्यात माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. माझ्या विधानामुळे कोणाचही नुकसान झालेल नाही. त्यामुळे आपल्याला कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

