महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर:
ऐतिहासिक महत्त्व आणि पार्श्वभूमी असलेल्या संगमनेरच्या हनुमान विजय रथाचे नूतनीकरण अखेरीस पूर्ण झाले आहे. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिनी म्हणजेच गुढीपाडव्याला या रथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. मारुतीरायाच्या चरणी हा रथ उत्सव समितीने एका कार्यक्रमात अर्पण केला असून हनुमान जयंतीदिनी रथाची मिरवणूक निघणार आहे.
संगमनेरकरांचे ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मोठ्या मारुती मंदिरापासून निघणाऱ्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला ऐतिहासिक महत्त्व आहे. धार्मिक तणावाचे कारण पुढे करत तत्कालीन ब्रिटिश सरकारने सन १९२७ ते १९२९ दरम्यान रथाच्या मिरवणुकीवर बंदी घातली होती. १९२९ मध्ये ब्रिटिशांचा हा बंदी आदेश मोडत महिला रणरागिनींनी रथाची मिरवणूक काढली होती. महिला शक्ती समोर ब्रिटिश अधिकाऱ्यांना देखील त्यावेळी झुकावे लागले हा इतिहास लक्षात घेत त्या वेळेपासून हा रथ ओढण्याचा मान संगमनेरातील महिलांकडे आहे.
असे असले तरी हनुमान जयंती उत्सवात मिरवणूक काढली जाणाऱ्या रथाची पार्श्वभूमी देखील शंभर वर्षांपूर्वीची आहे. साधारणत: १९०७ साली संगमनेर मधील प्रसिद्ध कलाकार सुंदर खरे मिस्त्री यांच्या संकल्पनेतून आणि कलाकुसरीतून या भव्य दिव्य रथाची निर्मिती करण्यासाठी सागवान लाकूड वापरले गेले. आज तब्बल ११५ वर्षानंतरही या रथाचा साचा आणि सांगाडा उत्तम स्थितीमध्ये आहे. १९९२ मध्ये रथाच्या साच्याचे काम भास्कर मिस्त्री यांनी केले होते. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार या रथामध्ये असलेल्या काही तांत्रिक त्रुटी दूर करण्याची गरज श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीला भासली.
त्यामुळे प्रसिद्ध आर्किटेक्ट विशाल काळे यांच्या माध्यमातून काही कुशल कारागिरांच्या मदतीने चार महिन्यांपूर्वी रथाच्या डागडूजीचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये ज्याच्या सहाय्याने रथ वळविला जातो तो रथाचा मुख्य दांडा, रथाचा कळस, रथाच्या सौंदर्यामध्ये भर घालणारी बाजूची नक्षी आदी अधिक कामांची गरज भासली ती पूर्ण करण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. हिंदू नववर्षाच्या पहिल्या देणे स्वतःच्या अनावरण करून रथ मारुतीरायाच्या चरणी अर्पण करण्यात आला.
श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये विजय नागरे पतसंस्थेचे अध्यक्ष व सनदी लेखापाल पराग सराफ यांच्या हस्ते रथाचे अनावरण करण्यात आले. यावेळी उद्योजक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका संघचालक अशोकराव सराफ, प्रसिद्ध शिवव्याख्याते पतीत पावन संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
रथाची डागडूजी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक ख़र्चाचे नियोजन श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई आणि उपाध्यक्ष कमलाकर भालेकर यांनी करत यासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. देणगीदारांमध्ये विजय नागरी पतसंस्था, सर्वोदय नागरी पतसंस्था, महेश नागरी पतसंस्था, शारदा नागरी पतसंस्था, साई सहस्त्रार्जुन पतसंस्था, संगमनेर मर्चंट्स बँक, स्वामी समर्थ परिवार, बाजारपेठ मित्र मंडळ आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच वैयक्तिक मदत करणाऱ्या सतिश दुर्गुडे, विरेश आडेप, कैलास खांबेकर, समीर कर्वे (लंडन), श्रीरंग भालेराव, दिलीप पडवळ यांचा सत्कार करण्यात आला. याच सोबत रथाचे काम आणि वर्षभर रथ ज्या ठिकाणी उभा असतो त्या शेडच्या कामासाठी वेळेची आणि आपल्या कौशल्यांची विनामूल्य उपलब्धता करून देणाऱ्या, रथाची कल्पकता आणि त्या कामासाठी कामगार पुरवणारे विशाल काळे, उत्सव समितीचा वार्षिक अहवाल तसेच रथावरच्या मूर्तीचे रंगकाम करणारे सुनील मादास, फॅब्रिकेशनचे काम करणारे लक्ष्मीकांत दसरे, ऋषिकेश मोंढे, रथावरची पितळी नावे बनविणारे मुकेश म्हाळणकर, अक्रेलीक नेमप्लेटचे काम करणारे संजय रहाणे, अल्युमिनियमच्या दोन उंच शिड्या दान करणारे भडांगे बंधू, नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी अरविंद गुजर, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साहित्य उपलब्ध करून देणारे संदीप मरडे, ट्रस्टच्या ऑडिटचे काम बघणारे रमाकांत वेडे यांचादेखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे कार्यकर्ते गिरीश देशपांडे, विनय गुणे, शामसुंदर जोशी, योगराजसिंग परदेशी, विनायक तांबे, योगेश मांगलकर, राम वामन, सर्वेश देशपांडे, प्रतीक जगताप, शुभम लहामगे, अनिकेत चांगले, अजित खेंगले, चेतन तारे, विलास परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले. मान्यवरांचा परिचय अक्षय थोरात, प्रास्ताविक कमलाकर भालेकर, कार्यक्रमाचे निवेदन वरद बागुल यांनी तर आभार श्रीराम गणपुले मानले.

