महाराष्ट्र संवाद न्यूज
अवकाळी पावसासह गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकाचे संगमनेर-अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला देण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत आठवड्यामध्ये अवकाळी पावसाने संगमनेर-अकोले तालुक्यामध्ये विविध भागात हजेरी लावली. शनिवारी दुपारी अचानक विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाठोपाठ गाराही पडू लागल्या. गारांमुळे बहुतांशी ठिकाणी स्नो फॉल जाणवत होता. गारांचा सडा नाशिक-पुणे महामार्गावर पडला होता. प्रचंड गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाला गारपिटीचा मोठा फटका बसला. अचानक वातावरणात बदल होऊन अर्ध्या तासाच्या आत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गारपिट झाली.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. यात गहू, हरभरा, मका, कांदा यासारख्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे. सातत्याने शेतकर्यांवर संकटे येत असून यातून शेतकरी सावरत नाही. त्यामुळे प्रशासनाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत व पठार भागातील जनतेला दिलासा द्यावा.
उभं असलेलं पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हाता-तोंडापाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतला. या अस्मानी संकटाने शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे, मेटाकोटीला आलेला आहे. आता या वाईट काळात शेतकरी पुनः उभा करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अगोदरच शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतीसाठी लागणारे सर्वच साहित्य सामग्री, पशुखाद्य सर्वच महागले आहे.
बाजारात शेतीमालाला भाव नाही,यामुळे शेतकरी अक्षरश: वैतागलेला असताना आठ-पंधरा दिवस उलटूनही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची योग्य ते पंचनामे झालेले नाहीत. जर संगमनेर-अकोले परिसराचे अधिकारी व संबंधित अधिकारी पंचनामे करण्यास, शेतकरी बांधवांना मदत देण्यास टाळाटाळ करत असतील तर शेतकरी बांधवांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या आदेशाने संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी जिल्हा प्रमुख मुजीब शेख, पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे, माधवराव तिटमे, शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, सौरभ चौधरी, ओंकार सावंत, राम एखंडे, संगमनेर शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, सदाशिव हासे, बाळासाहेब कवडे, उपशहर प्रमुख दीपक वनम, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, शहर समन्वयक असिफ तांबोळी, युवा सेनेचे अक्षय गाडे, माधव फुलमाळी, युवा सेनेचे शोएब शेख, रंगनाथ फटांगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

