महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्रपती संभाजीनगर:
छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान, रात्री दोनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर मधील किराडपुरा भागातील राममंदिराजवळ दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. किराडपुरा भागातील राममंदिराजवळ काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
नागपूरमध्ये फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून Tv-9 वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्देवी काहीही नाही.
सर्वांनी शांततेत रामनवमीचा कार्यक्रम पार पाडावा. कुठेही गडबड होऊ नये. तसेच शांततेचा भंग होऊ नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, तणाव निर्माण होईल, असं वर्तन कोणीही करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

