महाराष्ट्र संवाद न्यूज
ऑक्टोंबर 2022 मध्ये निळवंडे चे पाणी लाभार्थी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी कालव्यांची कामे दिवस-रात्र सुरू ठेवली. मात्र सरकार बदलले आणि ही कामे थंडावली आहे. मात्र या कामांमध्ये कोणी कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी धरणाचे पाणी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारच आहे, असा दृढ विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची गुरुवारी रामनवमीच्या दिवशी सांगता झाली. यावेळी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. सहकारी साखर कारखाना आणि तालुक्यातील सहकारी संस्थांमुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक अडचणींवर मात करत कारखान्याने यावर्षी दहा लाख मेट्रिक टनाचे यशस्वी गाळप केले असले तरीदेखील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
अनेक अडचणींवर मात करत निळवंडे धरण आपण पूर्णत्वास नेले आहे. कालव्यांच्या कामासाठी देखील मोठा निधी मिळविला. गत ऑक्टोंबरमध्ये दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे ध्येय समोर ठेवले होते. त्या दृष्टीने काम देखील सुरू होते. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये धरणातून पाणी आणणारच आहोत.
सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या समृद्धीमुळे वैभव शाली आणि प्रगतिशील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा क्रमांक लागतो. येथील सहकार, शिक्षण संस्था, व्यापार, शेती अतिशय चांगले असून या कामाचा अभिमान बाळगताना आपण सर्वांनी चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
माजी आमदार तांबे म्हणाले, बिनचूक आणि निर्विघ्नपणे थोरात कारखान्याचा हंगाम यशस्वीपणे पार पडला. कारखान्याच्या व्यवस्थापनाचा यात मोठा सहभाग असून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत नवनवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करण्याची आवश्यकता आहे. सहकारातून समाजाचे हित जपले जात असल्याने सहकार चळवळ जोपासण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बाबा ओहोळ यांचेदेखील यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले…
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे. उपपदार्थ निर्मिती सोबतच पुढील काळात इथेनॉल निर्मितीमध्ये कारखान्याला संधी आहे.
कामगारांना वेतन फरक 4 कोटी 21 लाख…
थोरात कारखान्याने सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक यांच्याबरोबर कामगारांचे हित जोपासताना अनेक दूरदृष्टीचे निर्णय घेतले. वेतन फरकापोटी 4 कोटी 21 लाख रुपये देण्याचा निर्णय आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर करताच सर्व कामगारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

