महाराष्ट्र संवाद न्यूज
छत्रपती संभाजीनगर:
“छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्वधर्मीयांना माझी विनंती आणि आवाहन आहे की, इतके वर्षे आपण सण आनंदाने साजरे करतो. आत्ताही शांतता राखा आणि उत्सव साजरे करा. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे.” असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
श्रीराम नवमीच्या आदल्या रात्री बुधवारी (ता. २९ मार्च) छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात तणाव निर्माण झाला. यामध्ये १३ वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तर काही ठिकाणी दगडफेक देखील करण्यात आली.
याप्रकरणी आता ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. पण यामुळे आता आणखी काही घटना घडू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेवरून आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याबाबत बोलताना म्हणाले की, भाजप राज्यात दंगली घडवण्याचा कट रचत आहेत. तसेच, भाजप आणि एमआयएम यांच्यात गुप्त बैठक झाली असून राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा यांच्याकडून कट करण्यात आला आहे.
या घटनेचे मुख्य मास्टर माईंड हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे.
तर, “संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्दैवी काहीही नाही,” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.

