महाराष्ट्र संवाद न्यूज
स्वतःला महाविकास आघाडीचे नेते म्हणून घेणारे सोयीनुसार राजकारण करत आहे. पदवीधर निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडी आठवली नाही, तेव्हा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. आत्ताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करत पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी तरी प्रामाणिक आहेत का? असा सवाल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. अध्यक्षस्थानी बापूसाहेब गुळवे होते.
विखे पाटील म्हणाले, सत्ता गेल्याचे दुःख अनेकांना लपवता येत नाही. स्वतःच्या अस्तित्वासाठी महाविकास आघाडीचा उपयोग सुरू आहे. वैफल्य आणि नैराश्याच्या भावनेतून त्यांची पोपटपंची सुरू आहे. अनेक वर्ष केवळ ठेकेदार आणि वाळू माफियांना पाठीशी घालण्याचे काम झाले. संगमनेर तालुक्यात ठेकेदारांना चुका दाखवायला सुरुवात केली तर, त्यांच्या नेत्यांनाच दुःख होऊ लागले आहे. जलजीवन मिशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराची सरकार गय करणार नाही.
महसूल विभागाच्या माध्यमातून आपण वाळूसाठी नवे धोरण आणले आहे. वाळू तस्करी यामुळे पूर्णपणे हद्दपार होईल. सामान्य माणसाच्या दारापर्यंत अवघ्या ६५० रुपयात वाळू देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी केवळ माफियांनी खिसे भरले. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनाही या माफियांचा त्रास झाला. सामान्य माणसांचे बळी गेले. त्यामुळे वाळू तस्करीतील गुंडगिरी संपविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील शेत शिवार, पानंद रस्ते आणि मोजणीच्या प्रलंबित प्रकरणाबाबतदेखील जलद गतीने कार्यवाही होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे.
शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आता एकाच अर्जावर सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध होणार असून त्याची अंमलबजावणी येत्या पंधरा दिवसात होईल. जनतेच्या मनातील हे सरकार असल्याने जनतेला जे हवे त्याच प्रकारचे निर्णय आम्ही करत आहोत.
कोरोना संकटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला दिलासा मिळाला. गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकारचे अस्तित्वही दिसले नाही. जिल्ह्यात मंत्री होते, मात्र एकही मंत्री जनतेपर्यंत गेला नाही. स्वतःची रुग्णालय असताना देखील कोविड सेंटर सुरू करू शकले नाही. असे असले तरी या संकटातून देश आज आत्मनिर्भरतेने उभा आहे. मोदींचे नेतृत्व विश्वव्यापी झाले. सरकारच्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळत आहे. पिक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर होत्या. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विम्याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. नमो किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांना १२ हजार कोटी रुपयांची मदत देण्याचे उदिष्ठ सरकारने ठेवले आहे. विकासाबरोबरच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी सरकारने पाऊले उचलली असून, शेतीपुरक व्यवसायातून रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वसंतराव देशमुख, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, सरचिटणीस जावेद जहागिरदार, भिमराज चत्तर, सुदामराव सानप, दिलीप शिंदे, शिवसेनेचे जनार्दन आहेर, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, शरद थोरात, संतोष रोहोम यांच्यासह सर्व विभागांचे आधिकारी उपस्थित होते.
○
सरकारने गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. या किटचे वितरण विखे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. जिल्ह्यात आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असून याचा लाभ सर्वच घटकांना होईल, असे सांगत दिवाळीतदेखील आनंदाचा शिधा घरपोच देत सरकारने ही योजना यशस्वी केल्याचे विखे म्हणाले.
□
जलजीवन मिशन हा पंतप्रधानांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याने सरकारच्या पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. यात ठेकेदारांची जबाबदारी मोठी असल्याने योजनेमध्ये कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही. कोणाला याचे दुःख वाटत असेल तरी, मला त्याची फिकीर नाही. जनतेच्या हितासाठी ठेकेदारांवर आमची दहशत राहील. आमच्या दहशतीची झाकणं उडविण्यापेक्षा तुमच्या कुकरच्या शिट्ट्या आणि झाकणं केव्हाच उडून गेल्याचा टोला विखे यांनी यावेळी लगावला.

