महाराष्ट्र संवाद न्यूज
देश सध्या एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे. सार्वभौम लोकशाही व्यवस्था आणि संविधानाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संविधान वाचावं, लोकशाही वाचावी या उद्देशाने काँग्रेसने राज्यात वेगवेगळी आंदोलने सुरू केली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी मधुकरराव नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत मिलिंद कानवडे होते.
नवले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात सामर्थ्यवान राज्यघटना असून सध्या याच घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली होत आहे. विरोधात बोलणाऱ्या विरोधकांचा आवाज बंद करण्याचे काम लोकशाहीला घातक असून सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेल्या काँग्रेसने सुरू केलेल्या जनआंदोलनात जनतेने सहभागी व्हावे.
लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही महत्त्वाचे असून भाजप सरकारकडून मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेल्या अदानी मोदी संबंधाबद्दल, शेल कंपनीतील 20 हजार कोटीच्या गुंतवणुकीबद्दल, चिनी नागरिकाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना पंतप्रधान उत्तर देत नाहीत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यांची मानहानी केली जात आहे. या संदर्भात देखील त्यांना सभागृहात बोलू दिले जात नाही.
उलट खासदार गांधी यांनी प्रश्न विचारल्यानंतर लगेचच त्यांच्या विरोधातील मानहानीचे प्रकरण बाहेर काढले जाते. न्यायालयाचा आधार घेत त्यांना दोन वर्षांची शिक्षा होताच तातडीने त्यांची खासदारकी 24 तासाच्या आतच रद्द केली जाते, त्यांचे निवासस्थान खाली करून घेतले जात आहे. सरकार सूडबुद्धीने एक कारवाई करत आहे आदानी घोटाळ्याची चर्चा होऊ नये यासाठी भाजप जाणीवपूर्वक राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप करून जनतेचे लक्ष इतरत्र वळवत आहे.
उलट तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि वाजपेयी यांच्या राजकारणाचा संदर्भ देत आत्ताच्या सरकारची ही वाटचाल हुकूमशाहीकडे जाणारी असल्याचे सांगत हे रोखण्यासाठी व देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसच्यावतीने देश, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर जन आंदोलने केली जाणार आहे. सत्याग्रही मार्गाने सर्व आंदोलन होणार असून देशाच्या हितासाठी सर्व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

