महाराष्ट्र संवाद न्यूज
देशाच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा शुभारंभ देशभरातील १ लाख ५९ हजार पोस्ट ऑफिसेसमधून करण्यात आला. संगमनेरमध्ये गणेशनगर मधील रहिवासी अपर्णा जोशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रथम महिला मानकरी ठरल्या.
संगमनेरमधील मुख्य डाकघर येथे यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निश्चित व्याजदर व जास्त परतावा यामुळे ही योजना महिलांच्या आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी व्यक्त केला. निश्चित आर्थिक ध्येयपूर्ती करण्यासाठी महिलांनी या खात्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी पोस्टमास्तर महेश कोबरणे यांनी केले.
अपर्णा जोशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रथम महिला मानकरी ठरल्याने त्यांचे अभिनंदन करून त्यांना तात्काळ ‘महिला सन्मान बचत पत्र’ खाते पुस्तक सहाय्यक पोस्टमास्तर कविता क्षीरसागर व सुमंत काळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी वैशाली कुलकर्णी, तेजस्विनी उपासनी, मनीषा ठुसे, नेहा उपासनी, रेश्मा वाकचौरे, तृप्ती काळे आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी शैलेश शिलवंत, प्रशांत जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रशांत बांगर, बाळासाहेब शिंदे, शांताराम बोऱ्हाडे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रदीप सोनकांबळे यांनी प्रास्ताविक तर नवनाथ कहांडळ यांनी आभार मानले.
‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेमुळे महिलांच्या आर्थिक नियोजनास मदत होईल. श्रीरामपूर विभागामधील सर्व पोस्ट ऑफिसेसमधून या योजनेचा लाभ घेता येईल. महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत आहे.
हेमंत खडकेकर, डाक अधीक्षक, श्रीरामपूर विभाग.
अशी आहेत योजनेची वैशिष्ट्ये-
☆ ७.५% निश्चित व्याजदर, चक्रवाढ पद्धतीने व्याज.
☆ सदर योजना महिला व मुलींकरिता उपलब्ध आहे.
☆ परिपक्वता कालावधी ०२ वर्षे
☆ गुंतवणूक- किमान रुपये १ हजार ते कमाल रुपये २ लाख.
☆ २ लाखापर्यंत कितीही बचतपत्रे घेता येतील. परंतु दोन खात्यांमध्ये किमान तीन महिन्याचे अंतर आवश्यक.
☆ एक वर्षानंतर ४०% रक्कम काढता येईल.
☆ अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.

