महाराष्ट्र संवाद न्यूज
सध्या सुरू असलेल्या कामांचा निधी मागील मविआ सरकारच्या काळातील आहे. मात्र सध्याचे पालकमंत्री मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत. काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते, हे सर्व जनतेला माहिती आहे. असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच 782 कोटी रुपयांचा मोठा निधी आपणच मिळविला असून यातून परिसरातील गावांच्या पुढील 25 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन झाले. मविआ सरकारच्या काळात निळवंडे कालव्यासाठी मोठा निधी मिळवून रात्रंदिवस काम सुरू ठेवले. डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे ऑक्टोबर 2022 पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. कामे आपणच केली आहे, मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले. सत्ता बदलामुळे आता काही दुसरे पाहुणे येतील आणि वेगळं काही सांगतील. परंतु कामे कोणी केली हे जनतेला माहिती आहे.
चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा या गावांच्या पाणीपुरवठा योजनेकरीता 59 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मिळवला. याच बरोबर निमगाव जाळी, कोल्हेवाडी, तळेगाव, निमोण, निमगाव, घुलेवाडी या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी आपण मविआ सरकारमधून सातत्याने निधी मिळवला. तालुक्यातील संस्था उत्तम रीतीने सुरू आहेत मात्र, या चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्यासाठी काही लोक उपद्रव निर्माण करत आहेत. जिल्ह्यात सध्या दहशतीचे राजकारण सुरू आहे. आपण सर्व एकत्रितपणे लढून त्यांना पुरून उरू.
देश व राज्यपातळीवर राजकारणाची अवस्था वाईट झाली असून खा. राहुल गांधी यांनी 20 हजार कोटींबाबत विचारलेल्या प्रश्नाला अद्याप पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. उलट तातडीने खासदारकी रद्द केली आहे. राज्यातील सरकार कोर्टाच्या निर्णयानंतर एका मिनिटात पायउतार होईल. धार्मिक तेढ निर्माण करून केले जाणारे राजकारण हे पुरोगामी व मानवतेचा विचार असलेल्या महाराष्ट्राला मान्य नसल्याचेही ते म्हणाले.
खबऱ्यांचा बंदोबस्त जनता करेल…
संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर खोट्या-नाट्या केसेस दाखल करण्याचे काम सध्या सुरू आहे. विकास कामात अडथळे आणणाऱ्या या खबऱ्यांचा बंदोबस्त जनताच करेल, असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

