महाराष्ट्र संवाद न्यूज
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपापल्या करियरसाठी धावत आहे. मात्र, तुमच्याकडे कौशल्ये नसतील तर केवळ पदवीला काहीही अर्थ नाही. आता तुमच्या थेट कामातून उच्च गुणवत्ता अपेक्षित आहे, म्हणूनच कामाचा निखळ आनंद मिळवून समर्पितवृत्तीने कार्य करणारे तरुणच भारताला सामर्थ्य संपन्न बनवतील, असे प्रतिपादन संगमनेर येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी केले.
मास्टर लर्नर्स फोनिक्स फाऊंडेशन तर्फे आयोजित प्रज्ञावंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फोनिक्स फाऊंडेशनच्या संस्थापक माया परदेशी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुचित गांधी उपस्थित होते.
कडलग म्हणाल्या, परंपरागत शिक्षण कुचकामी ठरत असतांना विद्यार्थ्यांनी नाविन्याची कास धरून आत्मविश्वासाने पुढे जावे. प्रामाणिकपणा जपा, विचलित होऊ नका. पालकांनी मोबाईलला स्पर्श करण्याऐवजी मुलांना स्पर्श करून प्रेम प्रदर्शित करावे म्हणजे मुले विचलित होणार नाहीत.
विद्यार्थ्यांनी आवडीच्याच क्षेत्रात करिअर करावे. अंगभूत कौशल्येच अधिक विकसित करता येतील. सद्यस्थितीत घरातील लोक एडियट बॉक्स टीव्हीमध्ये, आई फेसबुकवर तर वडील व्हाट्सएपमध्ये अडकलेले असतील तर मुलांनी मोठया अपेक्षेने कुणाकडे बघावे व प्रेमाची अपेक्षा कुणाकडे करावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षण व्यवस्थेला आजही पाणी पिण्यासाठी ‘वॉटर बेल’ उपक्रम राबवावा लागत असेल तर ते शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे.
मास्टर लर्नर्स फोनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेची कौशल्ये आत्मसात केली आहेत. माया परदेशी यांनी या क्षेत्रात समर्पितवृत्तीने दिलेले योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा नियमित संवाद असेल तर विद्यार्थी प्रगती करतील. इंग्रजी भाषा ही जगाच्या व्यवहाराची भाषा म्हणून वापरली जात आहे. इंग्रजी संभाषण कौशल्य विद्यार्थ्याना प्राप्त व्हावे म्हणून फोनिक्स फाऊंडेशन देत असलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
तविषा जाधव, यज्ञांग कर्पे, स्वराज काळे , प्रणिती भडांगे, विस्मय सराफ, पियुष घुले, आफ्रिका मिर्झा, श्रीराज वाकचौरे, दर्श घोडेकर, ध्रुव डोंगरे, स्वराज काळे, आराध्या धात्रक आदी प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
माया परदेशी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमामागचा हेतू विषद केला. याप्रसंगी प्रविण परदेशी,गणेश मगदुम, भावना चावरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रिद्धी मगदूम यांनी तर आभार प्रदर्शन राणी डोंगरे यांनी केले.

