महाराष्ट्र संवाद न्यूज
गीता परिवार संचालित संस्कार बालभवनमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या अकरा मारुतींच्या वेशभूषा करुन मुलांनी उपस्थितांना शिवकाळाचे दर्शन घडवले. बालभवनमध्ये जमलेल्या पालक व नागरीकांच्या उपस्थितीत हनुमानरुपी बालकांचे यावेळी पूजन करण्यात आले. मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणानंतर बजरंग बली की जयच्या घोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.
हनुमान जयंती निमित्ताने गीता परिवाराच्या संस्कार बालभवनमधील सर्व मुलांना महाबली हनुमानाच्या तर मुलींना अंजनी मातेच्या वेशभूषेत बोलावण्यात आले होते. यावर्षी शिवकाळात समर्थ रामदास स्वामींनी राज्याच्या कानाकोपर्यात स्थापन केलेल्या विविध अकरा मारुतींच्या वेशभूषा बालकांनी साकारल्या होत्या.
यात चाफळ येथील विरप्रताप मारुती, शिंगणवाडी येथील खडीचा मारुती, माजगावचा मारुती, उंब्रज येथील मठातील मारुती, चाफळ येथील दास मारुती, शहापूर येथील चुन्याचा मारुती, बत्तीस शिराळा येथील शिराळ्याचा मारुती, मनपाडळे मारुती, मसूर येथील महारुद्र हनुमान, पारगाव येथील बाल मारुती, बहे-बोरगावचा मारुती या ठिकाणच्या मारुतीच्या वेशभूषा मुलांनी हुबेहूब साकारल्या.
या कार्यक्रमासाठी मुलांचे पालक, नागरीक उपस्थित होते. बालगोपाल व त्यांच्या पालकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संस्कार बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी, राष्ट्रीय सहसचिव गिरिश डागा यांच्या मार्गदर्शनाखाली बालभवनच्या प्रशिक्षिका रुपाली रायकर, ज्योती भालेराव, स्वराली संत, ईश्वरी सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

