सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे, ‘आधार’ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोसावी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रसिद्धी प्रमुख राजाभाऊ भिलारे, मनेश भालेकर, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेन्द्र वाकचौरे व मित्रपरिवारामुळे अजय प्रेमानंद कोल्हे, रा. संगमनेर, जि. अहमदनगर या आजोबांच्या राहण्याचा व उपचारांचा प्रश्न लागला मार्गी लागला
महाराष्ट्र संवाद न्यूज
अजय प्रेमानंद कोल्हे वय 52 हे ‘अर्धांगवायू’ या जीवघेण्या आजाराने पीडित आजोबा… अनेक वेदना अन यातनांनी निकामी झालेले बरेच अवयव… अशातच मायेच्या माणसांनीच दुरावा धरल्याने आलेले असहाय एकाकीपण, यामुळे जगण्याची आशा अन मार्ग अंधुक झालेल्या या आजोबांना युवकांच्या प्रयत्नांनी हक्काचं घर अन मायेची माणसे मिळाली.
कोल्हे आजोबांना दोन वर्षापूर्वी अर्धांगवायुचा झटका आला होता. त्यात एक हात व एक पाय निकामी झाला. तेंव्हा खरं तर त्यांना खऱ्या मायेच्या आधाराची प्रचंड गरज होती. पण आयुष्याची साथ देण्याच्या आणाभाका घेतलेली धर्मपत्नी अन वंशाचा दिवा असणाऱ्या पोटच्या मुलानेही जेंव्हा त्यांना सांभाळायला नकार दिला तेंव्हा कोल्हे आजोबांवर खरंतर आभाळ कोसळले. रक्ताची नाती अन मायेच्या माणसांनी माणुसपणाचे रंग दाखवले अन आजोबा एकटे पडले.
अशा अवस्थेत त्यांची बहीण ‘सुनंदा’ यांनी त्यांची देखभाल करत सांभाळ सुरु केला. पण नियतीची चक्र पुन्हा फिरली अन सुनंदा ताईंना दुर्धर आजाराने ग्रासले व त्यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली. स्वतःचे आजारपण, नियमित डायलेसिस अन आजोबांच्या उपचारांचा खर्च या सर्वच बाबी त्यांच्यासाठी अशक्य होऊन बसल्या.
पण म्हणतात ना, माणुसकी विसरणारी माणसे जगात आहेत तशीच माणुसकी जपत ती जिवंत ठेवणारी, जपणारी माणसं ही आहेत. ती ना रक्ताच्या नात्याची असतात ना स्वार्थाने बांधलेली. फक्त आपल्या एखाद्या कृतीतून समाजहित साधलं जावं अशा माफक आनंदासाठी, गरजूच्या चेहऱ्यावरच्या एका आनंदाश्रुसाठी जीव ओतून कामं करणारी काही माणसं आज ही समाजात आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी तात्काळ ‘आधार’ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे यांच्याशी संपर्क साधून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेन्द्र वाकचौरे यांच्या मदतीने सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करून कोल्हे आजोबांना या कठीण काळात हक्काचा, मायेचा आधार मिळेल याची पुर्ण जबाबदारी घेतली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रसिद्धी प्रमुख राजाभाऊ भिलारे, मनेश भालेकर यांच्या सहकार्याने कोल्हे आजोबांना ‘मातृसेवा निवासी केंद्र’ चिंचवड या आधारकेंद्रात आणले गेले. आवश्यक त्या सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबींची पूर्तता केली गेली. ‘मातृसेवा’चे अध्यक्ष सुहास गोडसे यांचेही सहकार्य यासाठी लाभले. आता कोल्हे आजोबा ‘मातृसेवा निवासी केंद्रात’ राहतात. त्यांना मायेचा आधार तर मिळालाच पण सुनंदा ताईंवरचा भार ही खूप हलका झाला.
आता आजोबांच्या भोजन, निवास व उपचारांची सोय योग्यपणे झाली. त्यांच्या तब्येतीतही सुधारणा होतेय. त्यांना खरा मायेचा आधार मिळाला. जिथे मायेच्या माणसानी दूर केले तिथे काही कर्तव्यदक्ष अधिकारी, सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले काही कर्मयोगी समाजसेवक व अनेक पावलांना माणुसकीची वाट ज्यांच्यामुळे सापडते अशा काही सामाजिक कार्यकर्त्यांमुळे एका आजोबांचे पुनर्वसनच नाही तर ‘पुनर्जन्म’ झाला.
आपले कर्तव्य सक्षमतेने बजावतानाच सकारात्मक आत्मीयतेने ओतप्रोत भरलेले असे अधिकारी अन समाजातील तरुण जेंव्हा पाहायला मिळतात तेंव्हा माणुसकीवरचा विश्वास दृढ होतो. कितीही संकटे आली तरी त्यांच्याशी दोन हात करून ‘जिंदगी वसुल जगणारी’ ही मंडळी पहिली की आपली व्यवस्था नक्कीच सुरक्षित हातात आहे याची खात्री पटते. या मित्रपरिवाराच्या ठायी असणारी ही संवेदनशीलता केवळ अशा आजोबांनाच आधार देते असे नाही तर उठसुठ व्यवस्थेच्या नावे गळे काढणारांना ही चोख उत्तर देते हे खरे.

