महाराष्ट्र संवाद न्यूज
अयोध्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येमध्ये भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे, प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय वेगळे नसल्याचे सांगत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
नांव न घेता राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंनी टीका केली. ते म्हणाले, देशाबाहेर जाऊन भारताची बदनामी करणारे देशद्रोही आहेत. आपलं सरकार नसतं तर साधूंच्या जीवाला धोका असता. अयोध्या दौऱ्याला नावं ठेवू नका. नाही तर प्रभु श्रीराम धडा शिकवतील. असा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांना दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर वेगळीच वलय जाणवली. राम मंदिराचा स्वप्न बाळासाहेबांनी पहिल्यांदा बघितलं होतं. राम मंदिर हिंदुत्वाच प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिर उभारणीच्या कामाला वेग आला आहे. मंदिराचे काम इतक्या वेगाने होते आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. अयोध्येत आलो हा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. अयोध्येमध्ये माझं मोठं स्वागत झाले.
राम मंदिर हा राजकारणाचा विषय अजिबात नाही. मात्र माझ्या दौऱ्याचा काही लोकांना त्रास होत आहे. ते जाणून-बुजून माझ्यावर टीका करत आहेत. काही लोकांना हिंदुत्वाची ॲलर्जी आहे. हिंदूधर्म सर्व धर्मांचा आदर शिकवितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला आहे. अशा स्थितीत काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवित आहेत.
महाराष्ट्रात जनतेने भाजप-शिवसेनेला मत दिली. मात्र काही लोकांनी स्वार्थापोटी हा कौल नाकारला. आणि सत्तेसाठी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना, स्वप्नांना तिलांजली दिली. आज भाजप-शिवसेना सत्तेत आली, याचा जनतेला आनंद आहे. मी ऑफिस अथवा घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. जमिनीचे नातं असणारा मुख्यमंत्री आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे ते म्हणाले.

